
सोलापूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)।
केंद्र सरकारच्या अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्यक्रम कुटुंब योजनेअंतर्गत मोफत धान्य घेणाऱ्या सोलापूर शहर व ग्रामीण भागातील १ लाख ११ हजार १७० रेशन कार्डधारकांच्या पात्रतेची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. निकषांमध्ये न बसणारे लाभार्थी आढळल्यास त्यांचे मोफत धान्य कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकार्ड दरमहा ३५ किलो धान्य, त्यामध्ये २२ किलो गहू आणि १३ किलो तांदूळ दिला जातो. तर प्राधान्यक्रम कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत दिला जातो.
सोलापूर शहरात अंत्योदय आणि प्राधान्यक्रम योजनेचे सुमारे ५ लाख १९ हजार लाभार्थी आहेत. ग्रामीण भागातही सव्वाचार लाखांहून अधिक लाभार्थी या योजनांचा लाभ घेत आहेत. मात्र, यातील काही लाभार्थी शासनाच्या निकषांनुसार अपात्र असल्याचे निदर्शनास आले आहे.
केंद्र सरकारने अशा संशयित अथवा अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या १० ऑगस्ट रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना पाठविल्या आहेत. सोलापूर शहरातील ३९ हजार १२२, तर ग्रामीण भागातील ७२ हजार ४८ रेशन कार्डधारक या यादीत असल्याची माहिती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड