


नवी दिल्ली, 19 ऑगस्ट (हिं.स.)। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस कार्यसमितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत युवकांची स्थिती, राम मंदिरातील कथित देणगी चोरी आणि सीमा सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांवर केंद्र सरकारकडून उत्तर मागितले. त्यांनी बैठकीत कार्यसमितीच्या सदस्यांना या सर्व मुद्द्यांवर सखोल विचार करून आगामी राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करण्याचे आवाहन केले. बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख वरिष्ठ नेते उपस्थित होते.
खरगे म्हणाले की, संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर पहिल्यांदाच आपण सर्वजण भेटत आहोत आणि सर्वात मोठी चिंता युवकांची आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांनी युवकांना निराशा आणि बेरोजगारीच्या दलदलीत ढकलले आहे. शिक्षण आणि रोजगाराकडे दुर्लक्ष, पेपरफुटी आणि भरती घोटाळ्यांमुळे युवकांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. काँग्रेस युवकांसाठी स्पष्ट आणि कालबद्ध शिक्षण ते रोजगार रोडमॅप तयार करेल.
त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या धोरणांचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांनी युवकांना केंद्रस्थानी ठेवून मतदानाचे वय कमी केले, नवोदय विद्यालयांचे जाळे उभे केले आणि शिक्षण धोरणात रोजगार व कौशल्य विकासाचा समावेश केला. काँग्रेसच्या सरकारांनी शिक्षण आणि आयटी क्रांतीच्या माध्यमातून देशाला नवी दिशा दिली, मात्र गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारने युवकांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे.
खरगे म्हणाले की, पंतप्रधानांनी संसदेत राम मंदिर ट्रस्टची घोषणा केली होती आणि जनतेने प्रामाणिकपणाच्या अपेक्षेने देणगी दिली, मात्र तेथे मोठा घोटाळा समोर आला आहे. पंतप्रधानांनी श्रद्धाळू जनतेची माफी मागून स्पष्ट उत्तर द्यायला हवे. ते म्हणाले की, चीनकडून झालेल्या अतिक्रमणाशी संबंधित गंभीर तथ्ये समोर आली आहेत, मात्र सरकारने प्रामाणिकपणे माहिती देण्याऐवजी बातम्यांना चुकीचे ठरवले. राष्ट्रीय सुरक्षेवर राजकारण केले जाऊ नये, मात्र दुर्लक्षही करता येणार नाही. गलवान चकमकीनंतर पंतप्रधानांचे ‘ना कोई घुस आया है और ना कोई घुसा हुआ है’ हे विधान आजही प्रश्नांच्या भोवऱ्यात आहे.
खरगे म्हणाले की, युवकांचे भविष्य, जनतेची श्रद्धा आणि देशाच्या सीमा हे तीनही प्रश्न सरकारच्या उत्तरदायित्वाशी संबंधित आहेत. त्यांनी कार्यसमितीला आवाहन केले की, या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून देशासमोर पर्याय आणि समाधान मांडावे. पाच राज्यांच्या निवडणुका समोर आहेत आणि काँग्रेसला पूर्ण तयारी करावी लागेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule