
पिंपरी, पुणे , 28 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय अभिजात नृत्यकला व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात फार मोलाची भर घालते. नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती येते. मनाची एकाग्रता वाढून शारीरिक आणि मानसिक क्षमतेत वाढते. नृत्यकलांमध्ये संस्कृती संवर्धनाची क्षमता असून, संस्कारक्षम तरुण पिढीही निर्माण होते असे मार्गदर्शन नृत्यशारदा कथक कलामंदिर च्या संस्थापक वरदा वैशंपायन यांनी केले.
'नृत्योपासना 'भरत नाट्यम आणि ओडिसी नृत्यालयाचे स्नेह संमेलन पिंपरी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी वैशंपायन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ निरुपणकार रविंद्र पाठक व स्नेहल सोमण, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी नृत्यालयात भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य शिकणाऱ्या मुलींनी नृत्य सादरीकरण केले. वरदा वैशंपायन यांनी सर्वात कमी वयाची शिष्या रेवा कुंभार आणि आर्णा गुरु, हंसिनी रमेश, हर्षिता बिस्वाल यांच्या समवेत ओडिसी नृत्य सादरी केले. ओडिसी शिकणाऱ्या मुलींमध्ये रेवा ही वयाने सगळ्यात लहान विद्यार्थिनी होती. लहान वयात हे नृत्य शिकायला सुरुवात करून रंगमंचावर सुंदर नृत्य तिने सादर केले हे विशेष कौतुक आहे.भरतनाट्यम शिकणाऱ्या ४० विद्यार्थीनींनीही आपली कला सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.ओडिसी नृत्य सादरीकरणात, चौक आणि त्रिभंगी पदन्यास, बटू ही नृत्य सादर झाली. भरतनाट्यमच्या विद्यार्थीनींनी मल्लरी, पुष्पांजली, अलारिपु, जतीस्वरम, शब्दम्, कीर्तनम, अंबाष्टक, जावळी, कृष्ण भजन - जरा इतना बात दे कान्हा, बारा ज्योतिर्लिंग श्लोकम, तिल्लाना आणि अभंग या नृत्य रचना सादर केल्या त्याचे प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु