हिंगोली - भूकंपरोधक बांधकाम व इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी तांत्रिक कार्यशाळा
हिंगोली, 09 ऑगस्ट (हिं.स.)।हिंगोली जिल्ह्यात सातत्याने जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित व भूकंपरोधक बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी सीएसआयआर–केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान (सीएसआयआर–सीबीआरआय), रुडकी आणि जिल्हा प्रशासन, हिंग
अ


हिंगोली, 09 ऑगस्ट (हिं.स.)।हिंगोली जिल्ह्यात सातत्याने जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित व भूकंपरोधक बांधकामाला प्रोत्साहन देण्यासाठी सीएसआयआर–केंद्रीय भवन अनुसंधान संस्थान (सीएसआयआर–सीबीआरआय), रुडकी आणि जिल्हा प्रशासन, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी व अभियंत्यांसाठी भूकंपरोधक बांधकाम आणि इमारतींच्या संरचनात्मक पुनर्बांधणीबाबत तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .

या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी सीएसआयआर–सीबीआरआयचे मुख्य वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अजय चौरसिया यांनी भूकंपरोधक इमारत बांधकाम, जुन्या इमारतींचे संरचनात्मक सुदृढीकरण (रेट्रोफिटिंग), आधुनिक बांधकाम तंत्रज्ञान तसेच कमी खर्चात इमारती अधिक सुरक्षित करण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. वैज्ञानिक व तांत्रिक पद्धतींचा अवलंब केल्यास भूकंपामुळे होणारी जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

या कार्यशाळेच्या अनुषंगाने वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे संरचनात्मक सुदृढीकरण अर्थात रेट्रोफिटिंगचे काम सीएसआयआर–सीबीआरआयच्या तांत्रिक मार्गदर्शन व देखरेखीखाली यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. हे काम डॉ. अजय चौरसिया, हिमांशू शर्मा व रजनीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. भूकंपप्रवण भागातील जुन्या इमारती अधिक सुरक्षित करण्यासाठी हे काम प्रभावी नमुना ठरणार आहे.

दरम्यान, सीएसआयआर–सीबीआरआयच्या पथकाने भूकंपप्रवण पांगरा शिंदे गावास भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या विद्यमान घरांचे रेट्रोफिटिंग करून ते अधिक सुरक्षित व भूकंपरोधक कसे करता येईल, याबाबत पथकाने प्रत्यक्ष व व्यावहारिक मार्गदर्शन केले. तसेच भूकंपरोधक बांधकाम तंत्रज्ञान, सुरक्षित बांधकाम पद्धती आणि आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले की, जिल्ह्यातील भूकंपप्रवण व संवेदनशील भागांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार हिंगोली जिल्ह्यातील शासकीय इमारतींचे संरचनात्मक सुदृढीकरण अर्थात रेट्रोफिटिंग करण्यात येईल. सुरक्षित व आपत्तीप्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सीएसआयआर–सीबीआरआयचे वैज्ञानिक व तांत्रिक मार्गदर्शन अत्यंत महत्त्वपूर्ण असून, या सहकार्यामुळे जिल्ह्यातील बांधकामांची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यशाळेच्या आयोजनासह रेट्रोफिटिंगच्या कामासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे यांनी केलेले विशेष सहकार्य लाभले.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी सहभागी झाले. यावेळी शासकीय इमारती तसेच इतर बांधकामे अधिक सुरक्षित व भूकंपरोधक करण्यासाठी आवश्यक असलेल्या वैज्ञानिक तंत्रज्ञानाची आणि संरचनात्मक सुदृढीकरणाच्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande