
त्रंबकेश्वर, 09 ऑगस्ट (हिं.स.)। - तालुक्यातील घोडमणी गावाला जोडणारा पूल तातडीने दुरुस्त करीत सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून पूल उभारणीसाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विविध आपत्तीग्रस्त गावांना भेट देत पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी श्री. सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भूस्खलनाचा धोका असलेल्या जांभाची वाडी येथील ग्रामस्थांची भेट घेतली. या ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI