
रायगड, 09 ऑगस्ट (हिं.स.) - पावसाळी पर्यटनासाठी माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होत असतानाच केवळ २० ई-रिक्षांवर वाहतुकीचा भार असल्याने पर्यटकांची मोठी कोंडी होत आहे. ई-रिक्षा मिळविण्यासाठी पर्यटकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत असून, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसह कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे.
माथेरान हे वाहनमुक्त पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असल्याने पर्यटकांसाठी ई-रिक्षा सेवा महत्त्वाची ठरते. मात्र, सध्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असताना उपलब्ध असलेल्या केवळ २० ई-रिक्षा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे ई-रिक्षा स्थानकावर प्रवाशांच्या रांगा लागत असून, अनेक पर्यटकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.
पावसाळ्यात माथेरानच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणे तसेच राज्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. सुट्टीच्या दिवशी ही गर्दी आणखी वाढत असल्याने ई-रिक्षा सेवेवर अतिरिक्त ताण येत आहे. रांगेत उभे राहूनही रिक्षा वेळेत उपलब्ध होत नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ई-रिक्षांची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. गर्दीच्या दिवसांत अतिरिक्त रिक्षांची व्यवस्था करून प्रवाशांची कोंडी दूर करावी, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त होत आहे. माथेरानच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)