
नवी दिल्ली, 01 सप्टेंबर (हिं.स.)। बाळासाहेबांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता, ते देव्हाऱ्यात धनुष्यबाण पुजायचे. २०१९ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवलं आणि बाळासाहेबांची घटना देखील गोठवली. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि धोरण पुसण्याचे काम सुरु आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यघटना, पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचे अधिकार या सगळ्या बाबी आहेत. शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद सुरु झाला की त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली जातील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दिल्लीत शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची बैठक होणार असून त्यात संघटनात्मक चर्चा होईल, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैवतासमान आदर केला. पंतप्रधान मोदी यांनी नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रस्थापित केली.शिवरायांशी केलेली तुलना पंतप्रधानांनासुद्धा आवडणार नाही, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिष्टाचाराप्रमाणे सरकारी कार्यालयात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावले जातात, असे ते म्हणाले.
मराठा समाजाबाबत सरकार सकारात्मक, आंदोलकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आयोगाची स्थापना, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज अशा अनेक योजना मुख्यमंत्री असताना घेतल्या, आताही इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याची महायुती सरकारची भूमिका आहे. जे कायदेशीर आणि न्याय्य आहे ते देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर