

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर (हिं.स.)। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी रविवारी राजधानी नवी दिल्ली येथे मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांची नाश्त्यावर भेट घेतली. या भेटीत तिन्ही नेत्यांनी भारत-मलेशिया संबंधांवर चर्चा केली. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वरील पोस्टद्वारे या भेटीची माहिती दिली. त्यांनी राहुल गांधी यांना ‘चांगला मित्र’ संबोधत पुन्हा भेटण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.
काँग्रेसनेही समाजमाध्यम ‘एक्स’वर या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध केली. नवी दिल्ली येथे राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांच्यासह मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अन्वर इब्राहिम यांची नाश्त्यावर भेट घेतल्याचे पक्षाने म्हटले आहे. मलेशियाचे पंतप्रधान भारतात सुरू असलेल्या दोन दिवसीय अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अधिकृत दौऱ्यावर आले आहेत.
अन्वर इब्राहिम यांनी शनिवारी ब्रिक्स शिखर परिषदेत ‘समावेशक जागतिक प्रशासन आणि बहुपक्षवाद मजबूत करणे’ या विषयावरील सत्रात सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी ब्रिक्स सदस्य देशांच्या अन्य नेत्यांसोबत नवी दिल्लीतील वृक्षारोपण अभियानातही सहभाग घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रात्रीच्या भोजनालाही ते उपस्थित होते.
भारत दौऱ्यात अन्वर इब्राहिम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा केली. पंतप्रधान मोदी आणि अन्वर इब्राहिम यांच्या भेटीत भारत-मलेशिया व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण व सुरक्षा, सेमीकंडक्टर, पायाभूत सुविधा, डिजिटल अर्थव्यवस्था, ऊर्जा, वित्तीय तंत्रज्ञान, शिक्षण, पर्यटन तसेच दोन्ही देशांतील जनतेचे परस्पर संबंध अशा विविध क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेण्यात आला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, मलेशियाने सबाह प्रांतातील कोटा किनाबालू येथे भारताचे वाणिज्य दूतावास सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यात झालेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
दरम्यान, भारतातील आपल्या कार्यक्रमाबाबत अन्वर इब्राहिम यांनी सांगितले की, त्यांच्या दौऱ्यात केरळचाही समावेश असून ते तेथे भारताच्या ग्रँड मुफ्तींशी भेट घेणार आहेत. समुदाय विकास, शिक्षण आणि धार्मिक विषयांवर या भेटीत चर्चा होणार आहे. भारतातील राजनैतिक कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर अन्वर इब्राहिम हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या निमंत्रणावरून माले येथे अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule