भारतीय भाषा समागमाने विकसित भारताची पायाभरणी
भारतीय भाषा समागम-२०२६चे काशीमध्ये आयोजन वाराणसी, १३ सप्टेंबर (हिं.स.) : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेल्या भारतीय भाषांचे विश्व जितके वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे, तितक्याच व्यापक भारताच्या विकासाच्या शक्यता आहेत. भारतीय भाषा केवळ संवाद
भारतीय भाषा समागमात बोलताना हिन्दुस्थान समाचार समूहाचे अध्यक्ष अरविंद  मार्डीकर


भारतीय भाषा समागम-२०२६चे काशीमध्ये आयोजन

वाराणसी, १३ सप्टेंबर (हिं.स.) : काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत विस्तारलेल्या भारतीय भाषांचे विश्व जितके वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे, तितक्याच व्यापक भारताच्या विकासाच्या शक्यता आहेत. भारतीय भाषा केवळ संवाद आणि अभिव्यक्तीचे माध्यम नसून हजारो वर्षांपासून संचित झालेले ज्ञान, तत्त्वज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, लोकपरंपरा आणि जीवनदृष्टीच्या वाहक आहेत. या भाषांमध्ये जतन झालेले ज्ञान आधुनिक शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाशी जोडल्यास भारताच्या ज्ञानशक्तीला नवी उंची प्राप्त होऊ शकते.

जगातील प्राचीन आणि जीवंत शहरांपैकी एक असलेल्या काशीमध्ये रविवारी भारतीय भाषांच्या याच सामर्थ्याचे विराट दर्शन घडले. महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या गांधी अध्ययन पीठ सभागृहात बहुभाषिक वृत्तसंस्था हिन्दुस्थान समाचारतर्फे ‘भारतीय ज्ञानपरंपरा, प्रादेशिक भाषा आणि समृद्ध भारत’ या विषयावर भारतीय भाषा समागम-२०२६चे आयोजन करण्यात आले. या समागमात भारतीय भाषांमध्ये असलेल्या विविध ज्ञानपरंपरांना विकसित भारताच्या संकल्पनेशी जोडणे तसेच जागतिक ज्ञानअर्थव्यवस्थेत भारताची भूमिका अधिक बळकट करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले.

समागमाचे उद्घाटन केंद्रीय विद्यापीठ, हिमाचल प्रदेशचे माजी कुलगुरू आणि प्रमुख पाहुणे डॉ. कुलदीप चंद अग्निहोत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार टोलीचे सदस्य तथा प्रमुख वक्ते मुकुल कानिटकर, केंद्रीय उच्च शिक्षण संस्था, सारनाथ, वाराणसीचे कुलगुरू आणि विशेष अतिथी भिक्षू प्रा. (डॉ.) वंगछुग दोर्जे नेगी, राज्य माहिती आयुक्त पदुमनारायण (पी.एन.) द्विवेदी तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन व संस्कृती विभागाचे माजी मंत्री डॉ. नीलकंठ तिवारी यांच्या हस्ते संयुक्तरीत्या झाले. वैदिक मंत्रोच्चारांच्या वातावरणात भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पुष्प अर्पित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी हिन्दुस्थान समाचार समूहाचे अध्यक्ष अरविंद भालचंद्र मार्डीकर होते. मुख्य समन्वयक तथा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि झारखंडचे क्षेत्रीय संपादक डॉ. राजेश तिवारी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. महामना पं. मदनमोहन मालवीय हिंदी पत्रकारिता संस्थान, महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे संचालक डॉ. नागेंद्र कुमार सिंह यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदुस्थान समाचारचे संपादक जितेंद्र तिवारी यांनी केले.

काश्मीर ते कन्याकुमारी—एकच ज्ञानपरिवार

भारतीय भाषा समागमाच्या माध्यमातून देशाच्या भाषिक वैविध्याचे व्यापक चित्र समोर आले. विविध भाषांची स्वतंत्र ओळख जपत असतानाच त्यामागील भारताची समान सांस्कृतिक चेतनाही यावेळी अधोरेखित झाली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विविध भाषांमध्ये जतन झालेल्या ज्ञानधारा एकमेकांशी जोडल्या गेल्यास हजारो वर्षांची समृद्ध भारतीय ज्ञानपरंपरा अधिक व्यापक स्वरूपात जगासमोर येऊ शकते.

भाषांना जोडण्याचा अर्थ केवळ शब्द आणि साहित्याची देवाणघेवाण एवढाच मर्यादित नाही. एखाद्या प्रदेशात निर्माण झालेले ज्ञान, अनुभव आणि परंपरा दुसऱ्या प्रदेशापर्यंत पोहोचवणे, हाही त्याचा व्यापक अर्थ आहे. स्थानिक आणि प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असलेले ज्ञान आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल व्यासपीठे, शिक्षण आणि संशोधनाशी जोडल्यास भारताची भाषिक विविधता एका व्यापक ज्ञानजाळ्याचे रूप धारण करू शकते.

भारतीय भाषांकडे केवळ भूतकाळातील वारसा म्हणून न पाहता त्यांना भविष्यातील विकासशक्ती बनवण्याची गरज असल्याचे समागमात अधोरेखित करण्यात आले. भाषांमध्ये जतन झालेले ज्ञान आधुनिक संदर्भांमध्ये उपयुक्त ठरवणे ही विकसित भारताच्या निर्मितीतील महत्त्वाची कडी ठरू शकते.

वारशातून ज्ञान, ज्ञानातून नवोन्मेष आणि नवोन्मेषातून अर्थव्यवस्था

भारतीय भाषांमधील साहित्य, लोकज्ञान, पारंपरिक ज्ञान, तत्त्वज्ञान आणि जीवनानुभव हे केवळ सांस्कृतिक वारसे नाहीत. त्यामध्ये आधुनिक संशोधन, नवोन्मेष आणि नव्या ज्ञानाधारित उत्पादनांच्या निर्मितीसाठी मोठ्या संधी दडलेल्या आहेत. या ज्ञानाचे पद्धतशीर संकलन, जतन आणि आधुनिक ज्ञान-विज्ञानाच्या प्रणालींशी त्याची सांगड घालणे आवश्यक आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञान आणि आधुनिक भाषांतर प्रणालींमुळे या दिशेने नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असलेली सामग्री व्यापक समाजापर्यंत तसेच जगभर पोहोचवता येऊ शकते. त्यामुळे भाषिक अडथळे कमी होण्याबरोबरच भारतीय ज्ञानपरंपरेचे नवे आयामही समोर येऊ शकतात.

जागतिक ज्ञानअर्थव्यवस्थेत भारताची नवी ओळख

२१व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्थेत ज्ञान, प्रतिभा आणि नवोन्मेष हे निर्णायक घटक ठरले आहेत. अशा परिस्थितीत भारताची युवा प्रतिभा तसेच देशाची बहुभाषिक आणि बहुस्तरीय ज्ञानपरंपरा ही मोठी ताकद आहे. भारतीय भाषा समागमाने याच सामर्थ्याला विकसित भारताच्या संकल्पनेशी जोडण्याची दिशा स्पष्ट केली.

भारताच्या भाषिक वैविध्याला शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाशी जोडल्यास ही विविधता जागतिक पातळीवर भारताची स्वतंत्र ओळख आणि स्पर्धात्मक क्षमता अधिक बळकट करू शकते. प्रादेशिक भाषांमधील ज्ञानाचे डिजिटायझेशन आणि त्याचा आधुनिक पद्धतीने वापर देशाच्या बौद्धिक संपदेच्या विस्तारातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

भारतीय भाषा बनतील विकसित भारताची ज्ञानशक्ती

भारतीय भाषा समागमाचा मूलभूत संदेश असा राहिला की, भारतीय भाषांचे केवळ वारसा म्हणून संवर्धन करणे पुरेसे नाही; त्यांना ज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्थेशी जोडणे आवश्यक आहे. भारतीय भाषांमध्ये संचित असलेले ज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशभर आणि जगभर पोहोचल्यास संस्कृतीच्या वाहक असलेल्या या भाषा ज्ञाननिर्मितीच्या प्रभावी शक्तीत रूपांतरित होऊ शकतात.

भारतीय भाषांमध्ये दडलेली सांस्कृतिक संपदा आधुनिक ज्ञानअर्थव्यवस्थेशी जोडल्यास विकसित भारताच्या बौद्धिक आणि आर्थिक शक्तीला नवी दिशा मिळू शकते. काशीमध्ये आयोजित भारतीय भाषा समागम-२०२६ने याच संभाव्यतेवर प्रकाश टाकत भाषिक विविधता ही भारताची कमजोरी नसून ज्ञान, नवोन्मेष आणि जागतिक नेतृत्वासाठीची मोठी भांडवलशक्ती असल्याचे अधोरेखित केले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande