
बीड, 16 सप्टेंबर (हिं.स.)।
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस असून सध्या ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आहेत. उपोषणामुळे अशक्तपणा आल्याने त्यांनी पाटोद्यात सलाईन घेतले असून पाणीही प्यायल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. दरम्यान, डॉक्टरांकडून जरांगे पाटलांच्या प्रकृतीची तपासणी केली जात असून त्यांनी प्रवास करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या मुंबई दौऱ्यावर ठाम असून उद्या आपण मुंबईसाठी रवाना होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मी मुंबईला जाणार आहे, थांबणार नाही, मुंबईसाठी मी उद्या दुपारी निघणार आहे. आज मला जाता आला नाही, आजच्या ऐवजी मी उद्या दुपारी 1 नंतर मुंबईला जाणार आहे, अशी माहिती जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतून दिली.
सरकारकडून पश्चिम महाराष्ट्राचा नेहमी अपमान केला जातो, आम्हाला रस्त्यावर जास्त थांबवू नका. सरकारकडून ड्राफ्ट आलाय, राज्य सरकारचा ड्राफ्ट पाहून त्याबाबत बोलतो. मात्र, जे पाटोद्यात थांबले ते गावाकडे जातील, मला मुंबईला जाण्यापासून अडवल्यावर मी तुम्हाला बोलावून घेतो, असे म्हणत जरांगे पाटील यांनी त्यांच्या ताफ्यामागे आलेल्या मराठा बांधवांना गावकडे परतण्याचे सांगितले आहे. तसेच, मी संतांच्या सांगण्यावरून सलायन आणि पाणी घेतले, असेही ते म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis