डब्ल्यूपीएल २०२७: बीसीसीआयकडून पाचव्या हंगामाची घोषणा, जानेवारीत रंगणार स्पर्धा
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.) महिला प्रीमियर लीगचा (डब्ल्यूपीएल) पाचवा हंगाम १४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२७ दरम्यान खेळवला जाईल आणि क्रिकेटपटूचा लिलाव २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे होईल. पण, बीसीसीआयने अद्याप डब्ल्यूपीएलसाठी यजमान शहरांची घोषणा के
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ


नवी दिल्ली, 16 सप्टेंबर (हिं.स.) महिला प्रीमियर लीगचा (डब्ल्यूपीएल) पाचवा हंगाम १४ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२७ दरम्यान खेळवला जाईल आणि क्रिकेटपटूचा लिलाव २८ ऑक्टोबर रोजी कोची येथे होईल. पण, बीसीसीआयने अद्याप डब्ल्यूपीएलसाठी यजमान शहरांची घोषणा केलेली नाही. महिला क्रिकेटमधील सर्वात मोठी टी२० लीग म्हणून, डब्ल्यूपीएलने या खेळाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. ही लीग भारत आणि जगभरातील अव्वल क्रिकेटपटूंना एकत्र आणते आणि उदयोन्मुख प्रतिभेला सर्वोच्च स्तरावर कामगिरी करण्याची संधी देते.

क्रिकेटपटूंना संघात कायम ठेवण्याची अंतिम मुदत २८ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. बीसीसीआयने सांगितले की, पाच फ्रँचायझींना त्यांचे सध्याचे संघ कायम ठेवण्याची आणि आगामी हंगामासाठी त्यांच्या संघाची रचना अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची संधी मिळेल. २०२६ मध्ये, स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने आपले दुसरे डब्ल्यूपीएल विजेतेपद पटकावले. हे सामने नवी मुंबई आणि बडोदा येथे आयोजित करण्यात आले होते. डब्ल्यूपीएलची पहिली आवृत्ती २०२३ मध्ये खेळली गेली होती. आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या संघांनी प्रत्येकी दोनदा विजेतेपद पटकावले आहे.

या लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या पाच फ्रँचायझींचा समावेश आहे. लिलावापूर्वी फ्रँचायझी आपल्या संघांचे मूल्यांकन करणार असल्याने, क्रिकेटपटू कायम ठेवण्याचा कालावधी (रिटेन्शन विंडो) विशेषतः महत्त्वाचा ठरेल. पाचही संघांना फलंदाजी, गोलंदाजी आणि अष्टपैलू पर्यायांमध्ये संतुलित संयोजन तयार करावे लागेल, त्यामुळे सप्टेंबरमध्ये घेतलेले निर्णय एका महिन्यानंतर कोचीमधील त्यांची रणनीती ठरवतील. डब्ल्यूपीएलचे मागील काही हंगाम प्रभावी ठरले आहेत, ज्यात केवळ अनुभवी आणि परदेशी क्रिकेटपटूंनीच नव्हे, तर युवा भारतीय क्रिकेटपटूंनीही आपल्या दमदार कामगिरीने लक्ष वेधून घेतले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande