
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत 'सेमीकॉन इंडिया 2026 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना आणि या उपक्रमाच्या पाचव्या आवृत्तीचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी सर्व उपस्थितांचे मनापासून स्वागत केले. या परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींप्रति त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. परदेशातून भारतात आलेल्या पाहुण्यांचे मी विशेष स्वागत करतो, असे मोदी म्हणाले.
'सेमिकॉन इंडिया'चे उद्घाटन आणि 'विश्वकर्मा दिवस' या योगायोगाचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी देशाच्या बांधकाम आणि सृजनाच्या क्षेत्रातील शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेचा गौरव केला. पारंपरिक सर्जनशील शक्तीचा 21 व्या शतकातील तंत्रज्ञान आणि दूरदृष्टी बरोबर हा संगम म्हणजे एक सुंदर योगायोग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आत्मनिर्भर भारत आणि 'विकसित भारत' घडवण्यासाठी हीच आपली प्रेरणा आहे, असे मोदी म्हणाले.
गेल्या 15 दिवसांमध्ये देशाने साधलेल्या वेगवान प्रगतीवर भर देत, पंतप्रधानांनी काही महत्त्वाचे टप्पे अधोरेखित केले; यामध्ये 'ग्लोबल फिनटेक फेस्ट'मधील सर्वसमावेशक वित्तपुरवठ्यावरील चर्चा, 3,000 किलोमीटर लांबीची 'समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित होणे आणि त्रैमासिक जीडीपीमध्ये 7.8 टक्क्यांची दमदार वाढ यांचा समावेश होता. देशाच्या वाढत्या आर्थिक विश्वासार्हतेचा दाखला म्हणून त्यांनी जपानी पत मानांकन संस्थेने अलीकडेच 'सॉव्हरिन रेटिंग'मधील (सार्वभौम पतमानांकन) केलेल्या सुधारणेचाही उल्लेख केला. याचा अर्थ असा की, एकीकडे भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे आणि दुसरीकडे भारतावरील जगाचा विश्वासही वाढत आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.
भारताने यजमानपद भूषविलेल्या अलिकडच्या ब्रिक्स शिखर परिषदेतील धोरणात्मक यशाचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी सर्वसंमतीने 'नवी दिल्ली जाहीरनामा' स्वीकारला जाणे हे आंतरराष्ट्रीय एकमताचे निदर्शक असल्याचे नमूद केले. या ऐतिहासिक राजनैतिक यशामुळे भारतावर असलेला जागतिक समुदायाचा दृढविश्वास अधोरेखित होतो, यावर त्यांनी भर दिला. भारतावरील जगाच्या विश्वासाचा हा आणखी एक मोठा दाखला आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
2022 मधील सुरुवातीपासूनच्या `सेमिकॉन इंडिया`च्या उत्क्रांतीच्या प्रवासाचा मागोवा घेत, पंतप्रधानांनी सुरुवातीच्या धोरणात्मक चर्चेपासून ते प्रकल्प नियोजन, पायलट लाईन्स आणि अखेरीस व्यावसायिक उत्पादनाच्या सुरूवातीपर्यंतच्या प्रगतीचा आलेख मांडला. मोहाली आणि सुरत येथील दोन नवीन प्रकल्पांमघ्ये व्यावसायिक उत्पादन सुरू होण्यासोबतच, आता जागतिक ग्राहकांपर्यंत पोहोचत असलेल्या चिप्सच्या माध्यमातून या प्रयत्नांचे यश त्यांनी साजरे केले. आता भारताच्या प्रकल्पांमधून बाहेर पडणाऱ्या आमच्या चिप्स देश आणि जगातील ग्राहकांपर्यंत पोहोचू लागल्या आहेत, असे मोदी यांनी नमूद केले.
सेमिकंडक्टर व्यवस्था तयार करण्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या कामाची दखल घेत, पंतप्रधानांनी विक्रमी वेळेत चिप डिझाइन, उपकरण निर्मिती आणि चाचणी क्षमतांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले. त्यांनी सध्याच्या उद्योग जगतातील आघाडीच्या नेत्यांचे पायाभूत स्तंभ म्हणून कौतुक केले, ज्यांच्या भागीदारीमुळे हा जलद तांत्रिक टप्पा गाठणे शक्य झाले. भारताच्या या यशाचे तुम्ही स्तंभ आहात, तुम्ही भागीदार आहात, असे मोदी यांनी नमूद केले.
या क्षेत्राच्या अखंड गतीची रूपरेषा सांगताना पंतप्रधानांनी 'टेप आउट' ही संकल्पना स्पष्ट केली आणि सरकार कोणत्याही विश्रांतीशिवाय पुढील तांत्रिक आवृत्तीसाठी कशा प्रकारे सतत प्रयत्न करत आहे हे सांगितले. त्यांनी सेमिकंडक्टर अभियानाच्या 13.5 अब्ज डॉलरच्या भव्य दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली आणि आंतरराष्ट्रीय कंपनी , स्टार्टअप्स आणि डिझाइन संस्थांमधील सहकार्य सुलभ करणाऱ्या नवीन नियामक सुधारणांवर प्रकाश टाकला. भारत सरकार तुमच्या प्रकल्पांच्या यशासाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलत आहे, असे आश्वासन मोदी यांनी दिले.
एक मजबूत देशांतर्गत पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाचा तपशील देताना, पंतप्रधानांनी उत्पादन प्रकल्प विरहित कंपन्यांचे संगोपन करणे, बौद्धिक संपदा तयार करणे आणि एआय सक्षम पायाभूत सुविधांसाठी सिलिकॉन फोटोनिक्स समाविष्ट करण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी उपकरणे, रसायने, वायू आणि साहित्य क्षेत्रातील नेत्यांना मान्यताप्राप्त 12 प्रकल्पांद्वारे आणि विस्तारत असलेल्या मागणीच्या अपेक्षेनुरुप सादर केलेल्या सुवर्ण संधींचा फायदा घेण्याचे आवाहन केले. आम्हाला संपूर्ण व्यवस्था एकत्र वाढवायची आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले.
भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभाच्या धोरणात्मक फायद्यावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी अभियांत्रिकी प्रतिभेच्या विशाल समूहाबद्दल आणि विशेषतः चिप डिझायनिंगसाठी तयार केलेल्या व्यापक कौशल्य उपक्रमांबद्दल सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन केलेल्या चिप्स मिळाल्याचा अभिमानाने उल्लेख केला आणि 1 लाख अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला, ज्यामध्ये 70,000 विद्यार्थ्यांना आधीच प्रशिक्षित केले गेले आहे. असा मोठा प्रतिभा संच, एका अर्थाने, तुम्हा सर्वांसाठी सोन्याच्या खाणीपेक्षा कमी नाही, असे मोदी यांनी नमूद केले.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संशोधनात गुंतलेल्या प्रज्ञावंतांना आवाहन करत, पंतप्रधानांनी तरुण प्रतिभावंतांना देशांतर्गत प्रगत तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. त्यांनी उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्यांना स्थानिक संशोधन आणि विकासाचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले, जेणेकरून व्यवसाय आणि देशातील युवाशक्ती या दोघांचीही परस्पर प्रगती साधता येईल. यात उद्योगांचाही फायदा आहे आणि भारताच्या युवाशक्तीलाही यामुळे बळ मिळेल, असे मोदी यांनी सांगितले.
सेमीकंडक्टर बाजारातील बदलत्या गुंतागुंतीचा आढावा घेताना, पंतप्रधानांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धीमत्तेच्या प्रचंड मागणीमुळे आता केवळ ट्रान्झिस्टरच्या आकारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी होलिस्टिक सिस्टम इंटिग्रेशनकडे - ज्यामध्ये मेमरीची मांडणी आणि उष्णता व्यवस्थापन यांचा समावेश आहे. याकडे लक्ष दिले जात आहे. जागतिक उत्पादनातील या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी भारत एक विश्वासार्ह आणि सदैव सज्ज असलेले केंद्र म्हणून उभा राहत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारत यासाठी सातत्याने स्वतःला सज्ज करत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
हाय-परफॉर्मन्स कम्प्युटिंगसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जा सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर भाष्य करताना, पंतप्रधानांनी कृत्रिम बुद्धीमत्ता डेटा सेंटर्ससाठी लागणारी प्रचंड वीज आणि उत्पादन प्रकल्पांसाठी अखंडित वीजपुरवठ्याची गरज यांवर प्रकाश टाकला. त्यांनी ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या वेगाने होणाऱ्या विस्ताराची सविस्तर माहिती दिली; यामध्ये सौर ऊर्जा क्षमतेत 160 गिगावॅटपेक्षा अधिक वाढ, अणुऊर्जा क्षेत्रात खाजगी कंपन्यांचा सहभाग आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्सचा विकास यांचा समावेश आहे. म्हणूनच, आज भारत ऊर्जा क्षेत्रातही मोठी गुंतवणूक करत आहे, असे, मोदी यांनी नमूद केले.
ऊर्जा पायाभूत सुविधांचा जलद विस्तार आणि औद्योगिक सज्जता यांचा परस्पर संबंध स्पष्ट करताना, पंतप्रधानांनी सांगितले की, ही ऊर्जा सुरक्षा सेमीकंडक्टर व्यवस्थेला पाठबळ देणारी मूलभूत गरज आहे. औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यास सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी संबंधित घटकांना दिली. सेमीकंडक्टर उद्योगासाठी भारत एक पसंतीचे केंद्र बनावे, यासाठी आवश्यक ती सर्व पावले भारत उचलत आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
देशाच्या लोकशाही मूल्यांच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेत आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी उपस्थितांना भारतीय संविधानाच्या 75 वर्षांच्या वारशाची आठवण करून दिली. लोकशाहीची जननी असलेल्या देशात, एखादा महत्त्वपूर्ण उद्योग यशस्वी होणे म्हणजे संपूर्ण जागतिक पुरवठा साखळीला मजबूत करणे होय, असे सांगत त्यांनी भविष्यातील अफाट संधींचा शोध घेण्याचे निमंत्रण दिले. भारताच्या आकांक्षा तुमच्यासमोर आहेत आणि भारतात निर्माण होणाऱ्या नवीन संधी तुमचे स्वागत करण्यास सज्ज आहेत, असे मोदी यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे