
कोलकाता, 18 सप्टेंबर (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ या नावावर आणि अधिकृत निवडणूक चिन्ह ‘जोडी फूल’ यावर अंतरिम स्थगिती देत ते गोठवले आहे. या निर्णयानंतर आगामी ६ ऑक्टोबर रोजी नंदीग्राम आणि रेजीनगर मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ‘कालीघाट-तृणमूल’ आणि बंडखोर ‘ऋतब्रत-तृणमूल’ यापैकी कोणत्याही गटाला पक्षाचे मूळ नाव आणि चिन्ह वापरता येणार नाही. आयोगाने दोन्ही गटांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत त्यांच्या पसंतीची तीन पर्यायी नावे आणि चिन्हांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले होते. दोन्ही गटांनी ही यादी सादर केल्याची माहिती आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील कालीघाट गटाने गुरुवारी रात्री ई-मेलद्वारे आपल्या पसंतीची नावे आणि चिन्हांचे प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवले. मात्र, कालीघाट गटाने कोणती नावे आणि निवडणूक चिन्हे निवडली आहेत, याबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात येत असून त्याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
दुसरीकडे, बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटाने शुक्रवारी सकाळी आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची झूम बैठक बोलावून पर्यायांवर चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, ऋतब्रत गट आपल्या प्रस्तावित नव्या नावामध्ये ‘तृणमूल’ हा शब्द कायम ठेवण्याच्या बाजूने आहे. पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गटाकडून आयोगाला दोन प्रमुख पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये पहिले नाव ‘नॅशनलिस्ट तृणमूल काँग्रेस’ आणि दुसरे नाव ‘डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस’ असे आहे. आता राज्याच्या राजकीय वर्तुळात आयोग दोन्ही गटांना कोणती नावे आणि कोणती चिन्हे देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची परवानगी देतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
यापूर्वी पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडत भारत निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या नावाच्या आणि ‘जोडी फूल’ या निवडणूक चिन्हाच्या वापरावर तात्पुरती स्थगिती दिली. आगामी ६ ऑक्टोबर रोजी नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या अगोदर घेतलेला हा निर्णय ममता बॅनर्जी आणि बंडखोर ऋतब्रत बॅनर्जी या दोन्ही गटांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. आयोगाने गुरुवारी रात्री स्पष्ट केले की, खरी तृणमूल काँग्रेस कोणती आणि पक्षाच्या निधीवर कोणाचा अधिकार आहे, हे निश्चित होईपर्यंत कोणत्याही गटाला ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही.
१९९८ मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर २८ वर्षांनी प्रथमच पश्चिम बंगालमध्ये ‘जोडीचे फूल’ या चिन्हाशिवाय निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दोन्ही गटांना पोटनिवडणुकीसाठी स्वतंत्र नावे आणि आयोगाच्या राखीव यादीतील स्वतंत्र निवडणूक चिन्हे निवडावी लागणार आहेत. मात्र, त्यांना आपल्या नव्या नावासोबत ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’शी असलेल्या संबंधाचा उल्लेख करता येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने हा अंतरिम आदेश जारी केला असून पक्षाच्या मालकीबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.
अलीकडील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात मोठे संकट निर्माण झाले आहे. पक्षातील बंडखोरीनंतर बंडखोर गटाने ममता बॅनर्जी यांनी ठरवलेले विरोधी पक्षनेते शोभनदेव चट्टोपाध्याय यांना हटवून ऋतब्रत बॅनर्जी यांची त्या पदावर नियुक्ती केली होती. याशिवाय, संघटनात्मक पातळीवरही बंडखोर गटाने अरूप रॉय यांच्या अध्यक्षतेखाली नवी राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या एकेकाळच्या अत्यंत जवळच्या असलेल्या चंद्रिमा भट्टाचार्य आणि फिरहाद हकीम यांचाही आता ऋतब्रत गटाला पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, बुधवारी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदतही संपली. दोन्ही गटांनी आपापले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. नंदीग्राममधून ममता गटाने संचिता प्रधान दे यांना, तर ऋतब्रत गटाने मोहम्मद एहतशाम उल हक यांना उमेदवारी दिली आहे. रेजीनगरमध्ये ममता गटाकडून रबिउल आलम चौधरी, तर ऋतब्रत गटाकडून शेख सफीउद्दीन जमान हे उमेदवार आहेत.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर कालीघाट म्हणजेच ममता गटाचे नेते कल्याण बॅनर्जी आणि कुणाल घोष यांनी तातडीने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. शुक्रवारी पक्षाच्या नेत्या स्वतः याबाबत भूमिका मांडतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय केंद्र सरकार, भाजप आणि निवडणूक आयोगाचे षड्यंत्र असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे, ऋतब्रत गटाचे प्रमुख नेते अखरुज्जमां यांनी आयोगाच्या अंतरिम निर्णयाचे स्वागत केले आहे. भविष्यात पक्षाचे निवडणूक चिन्ह कायमस्वरूपी त्यांच्याच गटाला मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बहुतांश जिल्हाध्यक्ष आणि नेतृत्व त्यांच्या गटासोबत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule