नेपाळ पूर : मृतांची संख्या १,१२७ वर, ४,८५८ लोक अद्याप बेपत्ता; शोधमोहीम सुरू
काठमांडू, 02 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीने सर्वत्र हाहाकार माजला आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या अहवालानुसार, या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून १,१२७ वर पोहोचला आहे. आपत्तीला एक आठवडा उलटून गेला असतानाही सुरक्षा द
नेपाळ पूर : मृतांची संख्या १,१२७ वर, ४,८५८ लोक अद्याप बेपत्ता; शोधमोहीम सुरू


काठमांडू, 02 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळमध्ये नुकत्याच आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीने सर्वत्र हाहाकार माजला आहे. नेपाळ पोलिसांच्या ताज्या अहवालानुसार, या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून १,१२७ वर पोहोचला आहे. आपत्तीला एक आठवडा उलटून गेला असतानाही सुरक्षा दल आणि बचाव पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तसेच बेपत्ता झालेल्या हजारो लोकांचा शोध घेण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत.

नेपाळ पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या आपत्तीचा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. त्यानुसार चितवनमध्ये सर्वाधिक ३४८ मृतदेह सापडले आहेत. नवलपरासी पूर्वमध्ये २१७ मृतदेह, नवलपरासी पश्चिममध्ये १९० मृतदेह, नुवाकोटमध्ये १५५ मृतदेह,गोरखामध्ये ६६ मृतदेह, धादिंगमध्ये ५९ मृतदेह, रसुवामध्ये ४५ मृतदेह, तनहुँमध्ये ३८ मृतदेह सापडले आहेत.

राहत आणि बचाव कार्यात सहभागी असलेल्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण १,११३ मृतदेहांचे शवविच्छेदन आणि कायदेशीर ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी ९५ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.दरम्यान, अद्याप ९११ मृतदेहांची ओळख पटलेली नाही. या मृतदेहांची माहिती आणि छायाचित्रे नेपाळ पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहेत. त्यामुळे आपल्या बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांना मदत होणार आहे.

या भीषण संकटाचा सामना करण्यासाठी नेपाळ सरकार आणि सुरक्षा यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. आतापर्यंत सुरक्षा दलांनी प्रभावित भागांतून ६,५४१ नागरिकांची सुरक्षित सुटका केली आहे. मात्र, अजूनही ४,८५८ जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांचा शोध घेण्यासाठी बचाव मोहीम सातत्याने सुरू आहे. इतकेच नव्हे, तर प्रभावित भागांमध्ये शोधमोहीम, बचावकार्य, मदत साहित्याचे वाटप आणि मृतदेहांच्या व्यवस्थापनासाठी एकूण ७,९१२ पोलिस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, पोलिसांची पथके केवळ ढिगारा हटवून मार्ग मोकळा करण्याचे काम करत नाहीत, तर अतिधोकादायक भागात राहणाऱ्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे कामही करत आहेत.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नेपाळ-तिबेट सीमेच्या परिसरात बर्फ आणि खडक घसरल्याने किंवा कोसळल्याने अचानक भीषण पूर आला. या नैसर्गिक आपत्तीने २६ ऑगस्ट रोजी उत्तर आणि मध्य नेपाळमधील अनेक शहरांमधील तसेच गावांमधील जनजीवन उद्ध्वस्त केले. काही क्षणांतच अनेक भाग ढिगाऱ्याच्या रूपात बदलले आणि मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande