
राज्याचे गृहमंत्री गोविंदस कोंथौजम यांनी विधानसभेत दिली माहिती
इंफाल, 03 सप्टेंबर (हिं.स.) : मणिपूरमध्ये मे 2023 पासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात आतापर्यंत 306 जणांचा मृत्यू, तर 49 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री गोविंदस कोंथौजम यांनी आज, गुरुवारी विधानसभेत दिली.
विधानसभेच्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप आमदार सपम रंजन सिंह यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कोंथौजम यांनी ही माहिती दिली. हे आकडे 31 ऑगस्ट 2026 पर्यंतच्या नोंदीनुसार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात गृहमंत्री कोंथौजम म्हणाले की, राज्यात 3 मे 2023 रोजी हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 306 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 49 जण अजूनही बेपत्ता आहेत. मणिपूरमध्ये कुकी समुदायाने मैतेई समुदायांच्या विरोधात 3 मे 2023 रोजी जातीय संघर्षाला सुरुवात केली. डोंगराळ जिल्ह्यांमध्ये मैतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी काढण्यात आलेल्या ‘आदिवासी एकजूट मार्च’नंतर हिंसाचार उसळला होता.
या संघर्षामुळे मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे विस्थापन झाले. दीर्घकाळ सुरू असलेल्या हिंसाचाराचा राज्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरही मोठा परिणाम झाला.
मणिपूरच्या एकूण लोकसंख्येत मैतेई समुदायाचा वाटा सुमारे 53 टक्के असून, त्यांची मुख्य वस्ती इंफाळ खोऱ्यात आहे. तर नागा आणि कुकी यांसह आदिवासी समुदायांची लोकसंख्या सुमारे 40 टक्के असून, ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. दरम्यान, या जातीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर 13 फेब्रुवारी 2026 रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर 60 सदस्यांची विधानसभा निलंबित करण्यात आली. यानंतर 4 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रपती राजवट उठवण्यात आली आणि भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली नव्या सरकारची स्थापना करण्यात आली.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी