
अमरावती, ३ सप्टेंबर (हिं.स.)। चोरीच्या दुचाकी थेट बाजारात विकल्यास पोलिसांच्या हाती लागण्याची भीती असल्याने चोरट्यांनी चोरीच्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी नवा मार्ग अवलंबल्याचे समोर आले आहे. शहरातून चोरलेल्या दुचाकी थेट भंगार विक्रेत्याला विकून त्यांचे सुटे भाग करून घेणाऱ्या टोळीचा राजापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन कुख्यात दुचाकी चोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल १६ दुचाकी आणि त्यांचे सुटे भाग असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वसीम खान बब्बू खान (४०, रा. हैदरपुरा), शेख इरफान उर्फ भुऱ्या शेख मन्सूर (३६, रा. साधीया नगर) आणि सद्दाम अली फैयाज अली (३५, रा. बिस्मिल्ला नगर) यांचा समावेश आहे.
पोलिस तपासात आरोपींच्या चोरीच्या पद्धतीचा धक्कादायक खुलासा झाला आहे. चोरीची दुचाकी बाजारात विकल्यास वाहनमालक अथवा पोलिसांकडून पकडले जाण्याची शक्यता असल्याने आरोपींनी थेट भंगार व्यावसायिकाशी संपर्क साधला होता. आरोपी प्रत्येक चोरीची दुचाकी अवघ्या पाच हजार रुपयांत भंगार विक्रेत्याला विकत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या व्यवहारासाठी आरोपींनी संबंधित भंगार विक्रेत्याशी मैत्रीही केली होती. दुचाकी मिळाल्यानंतर भंगार विक्रेता तिचे विविध सुटे भाग करून विक्री करत असल्याने चोरीच्या वाहनाचा माग काढणे पोलिसांसाठी अधिक कठीण होत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शहरातून आतापर्यंत १०० ते १२५ दुचाकी चोरी करून त्या भंगार व्यावसायिकांना विकल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे या टोळीचा चोरीचा आकडा मोठा असल्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
भातकुली पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी सचिन वैद्य यांची दुचाकी १ सप्टेंबर रोजी राजापेठ बसस्थानकातून चोरीला गेली होती. या घटनेचा तपास करताना राजापेठ पोलिसांना तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात यश आले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी