
नांदेड, 04 सप्टेंबर (हिं.स.)। किनवट तालुका तसेच तेलंगणा सीमावर्ती भागातील नागरिकांची वाढती रहदारी आणि गैरसोय लक्षात घेता किनवट आगारातून किनवट ते निर्मल बससेवा सकाळी ७ वाजता आणि निर्मलहून किनवटकडे परतीची बस सायंकाळी ७ वाजता सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय पोचिराम बोलेनवार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी किनवट आगार प्रमुखांना निवेदन दिले.
किनवट तालुक्यातील नागरिकांचे निर्मल, निजामाबाद, करीमनगर, आर्मूर आणि मेटपल्ली या भागांशी कौटुंबिक तसेच व्यापारी संबंध आहेत. त्यामुळे या मार्गावर दररोज मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. मात्र, सध्या निर्मल डेपोची किनवटहून पहिली बस सकाळी १० वाजता सुटते आणि दुपारी १ वाजता निर्मलला पोहोचते. त्यामुळे पुढील कामांसाठी प्रवाशांना वेळेची मोठी अडचण निर्माण होते. निर्मलहून किनवटकडे परतीची शेवटची बस दुपारी ३ वाजताच असल्याने एकाच नागरिकांना दिवसात आपली कामे पूर्ण करून परतणे शक्य होत नाही. यापूर्वी सकाळी ६ वाजताची रात्र-मुक्कामी बससेवा उपलब्ध होती; मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ती बंद आहे. तेव्हा प्रवाशांची गरज लक्षात घेऊन ही बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis