
बीड, 04 सप्टेंबर (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून माजलगाव,धारूर व वडवणी तालुक्याच्या जिवनदायिनी असलेल्या कुंडलिका नदीवरील पाच कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे आधुनिक ‘एलिप्टिकल कमान बंधारा (Elliptical Arch Type Bandhara)’ मध्ये रूपांतरण करण्याच्या प्रस्तावाने वेग घेतला आहे. या संदर्भात जलसंपदा विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अशी माहिती ओमप्रकाश शेटे यांनी दिली आहे.
शेटे यांनी सांगितले की या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी एक अधिकृत पत्र काढले आहे. अवर सचिव रो. र. पोळ यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्रात (क्र. व्हीआयपी-२०२६/प्र.क्र.३८२/सिंव्य(कामे)) कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांना निर्देश देण्यात आले आहेत की, सदर विषयाच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी व आपला वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करावा.
सध्या अस्तित्वात असलेले कोल्हापुरी बंधारे (K.T. Weir) हे २००६ पासून कधीच भरले पन नाहीत आणि कायम नादुरुस्तच राहिले. सदरील बंधारे यास कोल्हापूरी पद्धतीचे दरवाजे टाकले तर ते सध्या ते शक्य पन नाही आणि यात मोठा खर्च आणि मनुष्यबळ वाया जाते. एलिप्टिकल आर्च टाईप बंधारे हे कायमस्वरूपी, अत्यंत मजबूत आणि कमी देखभाल खर्चाचे असतात. यामुळे बंधाऱ्याची पाणी अडवणूक क्षमता वाढेल, शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी जास्त काळ पाणी उपलब्ध होईल, भूजल पातळीत मोठी वाढ होईल तसेच कुंडलिका नदी परिसरातील लोकांच्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. फडणवीसांनी नियमित केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रलंबित प्रश्न आता मार्गी लागत आहे. गोदावरी महामंडळाचा अहवाल आल्यानंतर शासन लवकरच या कामांना प्रशासकीय मंजुरी देईल. शेतकऱ्यांना जलसंजीवनी देणारा हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे, हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis