
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
शहरातील युवतीच्या धक्कादायक हत्येच्या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणात आमदार रवी राणा यांनी आक्रमक भूमिका घेत मृत युवतीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.युवतीच्या हत्येच्या घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या रवी राणा यांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनाही खडेबोल सुनावले. शहरात अशा प्रकारच्या गंभीर गुन्हेगारी घटना घडत असतील तर ही बाब पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे त्यांनी म्हटले. युवतीची हत्या ही पोलिसांची नाकामी असल्याचा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पोलिसांचा कायम वचक राहणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन गुन्हेगारांविरोधात कठोर आणि प्रभावी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रवी राणा यांनी केली. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक सतर्क राहून गुन्हेगारीवर अंकुश ठेवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या हत्येप्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, या धक्कादायक हत्याकांडामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोपींवर कोणती कारवाई होते आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळतो, याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी