
रायगड, 06 सप्टेंबर (हिं.स.)। मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम १७ वर्षांपासून रखडले असून, रस्त्याची दुरवस्था, खड्डे आणि अपूर्ण कामांमुळे प्रवाशांसह कोकणवासीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने ११ सप्टेंबर २०२६ रोजी पाहणी दौरा आयोजित करण्यात आला आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहितदादा पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दौरा होणार आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असतानाही चार ठिकाणी टोल नाके सुरू असल्याचा मुद्दा पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे. रस्त्याच्या विकासासाठी नागरिकांकडून टोल वसूल केला जात असताना प्रवास मात्र खडतर असल्याने सरकारला जाब विचारण्यात येणार आहे.
रायगडमधील बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्रात स्थानिक भूमिपुत्रांना कायमस्वरूपी रोजगार न मिळणे आणि थर्ड पार्टी कामगार म्हणून काम करण्याची वेळ येणे, या प्रश्नांकडेही दौऱ्यात लक्ष वेधले जाणार आहे. तसेच पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान आणि त्यांच्या प्रश्नांवर सरकारची भूमिका याबाबत आमदार रोहित पवार आवाज उठवणार आहेत.
महिला व बालकांचे पोषण, महिलांचे आरोग्य व शिक्षण, महिलांवरील अत्याचार आणि विविध योजनांमधून महिलांना वगळल्याच्या आरोपांवर रोहिणीताई खडसे सरकारला धारेवर धरणार आहेत. गेल्या १७ वर्षांत महामार्ग पूर्ण करण्याच्या अनेक मुदती जाहीर होऊनही काम अपूर्णच आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा सुरक्षित प्रवास, टोलचा आर्थिक भार आणि रायगडमधील विविध प्रश्नांसाठी हा पाहणी दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)