
नांदेड, 06 सप्टेंबर, (हिं.स.)। आखाडा बाळापूर ते सापळी परिसरातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची अत्यंत महत्त्वाची व प्रलंबित असणारी रस्त्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. इरिगेशन कॅम्प (आखाडा बाळापूर) ते सापळी या मुख्य रस्त्याच्या नूतनीकरणाच्या व सिमेंट काँक्रेट रस्त्याचे कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
रस्त्यावरील फुलांची काम सुरू झाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी मोठा सुटकेचा निश्वास सोडला आहे. रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू झाल्याची बातमी समजताच सापळी आणि लगतच्या कुपटी गावातील नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली होती. रस्त्यावर पडलेले भलेमोठे खड्डे, उडणारी धूळ आणि पावसाळ्यात निर्माण होणारा चिखल यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे म्हणजे स्थानिक नागरिकांसाठी एक मोठी कसरत ठरत होती. खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले होते, तसेच शाळकरी विद्यार्थी, शेतकरी आणि रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे अत्यंत कठीण होऊन बसले होते. आखाडा बाळापूर या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असल्याने दैनंदिन प्रवासासाठी नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी सापळी आणि कुपटी येथील गावकऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी तसेच स्थानिक तरुणांनी प्रशासनाकडे सातत्याने लेखी निवेदने देऊन आणि पाठपुरावा करून रस्त्याच्या कामाची मागणी लावून धरली होती. अनेकदा आश्वासनांशिवाय काहीही हाती पडत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis