
लातूर, 06 सप्टेंबर (हिं.स.)। गेल्या अनेक दिवसापासून रेणापूरसह अनेक भागातील शेतकरी, नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, पावसाअभावी पिके गळून पडण्याच्या मार्गावर असून, देव पाण्यात ठेऊन बळीराजा पावसाची वाट पाहत आहे. लवकरात लवकर पाऊस पडावा यासाठी रेणापूर शहरातील भाविक भक्तांच्या वतीने श्री.अमृत्तेश्वर महादेव मंदिरास जलअभिषेक करून साकडे घालण्यात आले.
प्रथमता: रेणा नदीतून 10 घागरी भरून आणून त्या पाण्याचा जलअभिषेक केला व महादेवाच्या पिंडीवर पाणी वाहिले, त्यानंतर मंदिर परिसरातील अनेक महिला, पुरुष, लहान लहान मुलांनी जवळील बोर, हातपंपचे पाणी आणून मंदिराचा आतील संपूर्ण गाभारा आणि महादेवाची पिंड पाण्याने भरून काढली. आरती करून सर्वांनी हर हर महादेवच्या घोषणा देऊन पावसासाठी साकडे घातले. यावेळी उमेश सोमाणी, महेश गाडे, अजय गाडे, सुरज लोकरे यांच्यासह आदी कार्यकर्ते, महिला भक्त उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis