
नवी दिल्ली, 07 सप्टेंबर (हिं.स.)। देशातील प्रमुख कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (एमएसआयएल)ने आपल्या निवडक मॉडेल्सच्या किमतींमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, सप्टेंबरपासून काही कारच्या किमती २० हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. यावर्षी मे महिन्यानंतर कंपनीकडून कारच्या किमतींमध्ये करण्यात आलेली ही तिसरी वाढ आहे. वाढीव दर सप्टेंबरपासूनच लागू झाले आहेत.
मारुती सुझुकी इंडियाने सोमवारी शेअर बाजाराला नियामक फायलिंगमध्ये सांगितले, ‘‘कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेता कंपनीने निवडक मॉडेल्सच्या किमती २० हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. किमतींमध्ये ही वाढ सप्टेंबर २०२६ पासून लागू होईल.’’ कंपनीने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या खर्चाचा परिणाम शक्य तितका कमी करण्यासाठी खर्च कमी करण्याच्या उपाययोजनांद्वारे कंपनी सातत्याने प्रयत्न करत आहे. मारुती सुझुकी इंडियाच्या म्हणण्यानुसार, ‘‘महागाईचा दबाव उच्च पातळीवर कायम आहे आणि खर्चाचे प्रतिकूल वातावरणही कायम आहे. अशा परिस्थितीत वाढलेल्या खर्चाचा काही भाग बाजारावर टाकणे कंपनीला भाग पडत आहे.’’
उल्लेखनीय म्हणजे, मारुतीने ऑगस्टमध्ये आपल्या सर्व गाड्यांच्या किमतींमध्ये सरासरी सुमारे ०.५ टक्के वाढ केली होती. या प्राइस हाइकमुळे मारुतीच्या कार वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंट्सनुसार २,५०० ते ३० हजार रुपयांपर्यंत महागल्या होत्या. मे महिन्यानंतर कारच्या किमतींमध्ये करण्यात आलेली ही तिसरी वाढ आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule