मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे होणार निरसन
मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर दिनांक १८ एप
मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे होणार निरसन


मुंबई, 20 एप्रिल (हिं.स.) भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली आहेत आणि आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिले आहे.

यांमध्ये सर्वसामान्य माहिती, अर्जाची स्थितिगती, मतदार ओळखपत्र प्राप्त न होणे, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणे, स्थलांतर केल्यानंतर पत्त्यातील बदल, विविध दुरुस्त्या, नाव वगळणी, मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडणे, मतदार ओळखपत्र हरवणे, मतदार ओळखपत्राशी मोबाइल क्रमांक जोडणे, इत्यादी विषयांच्या अनुषंगाने माहिती विचारणारे फोन आलेले आहेत. आलेल्या फोनमध्ये सर्वसामान्य माहिती विचारणारे फोन सर्वाधिक होते. असे १३३२ फोन आले. सर्वसामान्य माहितीमध्ये मतदारसंघाचा संपर्क क्रमांक व पत्ता, ऑनलाइन अर्जाबाबत माहिती विचारली गेली. त्या खालोखाल अर्जाची स्थितिगती जाणून घेण्यासाठी ५०७, मतदार यादीत नाव तपासण्यासाठी ५०३, मतदार ओळखपत्र प्राप्त न झाल्याबद्दल ४७०, नवमतदार नोंदणीसाठी ४५४ फोन आले. उर्वरित फोन संकीर्ण माहितीसाठी विचारण्यात आले.

महाराष्ट्रातील मुंबई उपनगर या जिल्ह्यातून सर्वाधिक फोन आले, त्यांची संख्या १५७५ इतकी होती. ठाणे जिल्ह्यातून ९९१, मुंबई शहरातून ५२०, रायगडमधून १८२ आणि पुण्यातून १६३ फोन आले.

१८००२२१९५० या मतदार साहाय्यता क्रमांकाशिवाय महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ०२२ - २२०२१९८७ आणि ०२२ - २२०२६४४२ हे दोन अतिरिक्त क्रमांकही मतदारांना त्यांच्या मनातील शंका व प्रश्न विचारण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे आणि समाधानकारक उत्तरे देण्यात येत आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande