ठाण्यात आंबा महोत्सवाची धूम
ठाणे, २८ एप्रिल, (हिं.स) यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महा
ठाण्यात आंबा महोत्सवाची धूम


ठाणे, २८ एप्रिल, (हिं.स) यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच,संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने १ मे ते १२ मे या कालावधीत सकाळी १० ते रात्रौ १० या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आंबा महोत्सवाचे हे यंदाचे १७ वे वर्ष आहे. यावेळी मुख्य आयोजक आ. संजय केळकर यांच्यासमवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, माजी उपमहापौर सुभाष काळे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील आदी उपस्थित होते.

ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात हा आंबा महोत्सव होत आहे. शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात, कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच, आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे ४५ आणि बचतगटांचे पाच असे ५० स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.

यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी, दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसुन एक चळवळ आहे. गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक भेट देत असतात. तेव्हा, जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे.असे आवाहन करून आ. केळकर यांनी याठिकाणी प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध आहे. तरी, कोकणातील अस्सल हापुस आब्यांसाठी खवय्यांनी राजेंद्र तावडे ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधावा.असेही आ. केळकर यांनी सांगितले.

हवामान बदलामुळे @ ४० टक्के आंबा पीक

कोकणात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो.यंदा अवकाळी पाऊस,ढगाळ हवामान तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. यंदा अवघे ४० टक्के आंबा उत्पादन झाले आहे. २०२१ साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न ३ लाख २० हजार मेट्रीक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री झाली आणि १०० कोटीचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन २०२२ मध्ये २ लाख ५६ हजार मेट्रीक टन आणि २०२३ मध्ये १ लाख २८ हजार मेट्रीक टन उत्पादन झाले असून १२६ कोटीची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटींचा आंबा निर्यात केला गेला.

त्यामुळे मागील नऊ वर्षांपासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे.

महोत्सवात मिळणार अस्सल हापुस...

सध्या बाजारात हापुस आंब्याच्या नावाखाली सर्रास कर्नाटकचा आंबा विकला जातो. कोकणातील अस्सल हापुस कापल्यावर केशरी रंगाचा असतो. तर कर्नाटकी आंबा पिवळा असतो. ठाण्यातील आंबा महोत्सवात ५०० ते ९०० प्रती डझन या दराने आंबा उपलब्ध असुन तरी चोखंदळ ग्राहकांनी महोत्सवातच अस्सल हापुस खरेदी करावी. असे आवाहन कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande