सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये मोठी चकमक
नारायणपूर, 30 एप्रिल (हिं.स.) : छत्तीसगडमध्ये आज, मंगळवारी सकाळपासून मोठी चकमक सुरू आहे. बस्तरमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाडमध्ये अनेक ठिकाणी जवानांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. अबुझमाडच्या जंगलात जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) आणि एसएफटी पथके आणि नक्षलवादी यांच्यात जोरदार गोळीबार सुरू असून आतापर्यंत 4 नक्षलवादी ठार झाले आहेत.
आयजी पी सुंदरराज व एसपी प्रभात कुमार या चकमकीवर लक्ष ठेवून आहेत. जंगलात अनेक ठिकाणी जवानांनी नक्षलवाद्यांना वेढा घातला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर जिल्ह्यात ज्या भागात नक्षलवादी आहेत तिथेच हे जवान तळ ठोकून आहेत. नारायणपूरचे एसपी प्रभात कुमार यांनी चकमकीला दुजोरा दिला आहे. मात्र, या चकमकीत नक्षलवाद्यांचे किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 4 नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. सध्या या परिसरात जोरदार चकमक सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी कांकेर जिल्ह्यातील छोटा बेथिया येथे जवानांनी 29 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता.
हिंदुस्थान समाचार