सांगली, 01 मे (हिं.स.) : देशात जर काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता मिळाली तर ते जाती-जीतीत फूट पाडतील असा आरोप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. सांगली येथे खासदार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी योगी आदित्यनाथ म्हणाले की, जगात पूर्वी देशाचा सन्मान होत नव्हता. शेतकरी, व्यापारी, मुली देशात सुरक्षित नव्हत्या. परंतु, 2014 नंतर परिस्थिती बदलली देशाची सीमा सुरक्षित झाल्या आहेत. दहशतवाद पूर्णपणे नष्ट झालाय. परंतु, काँग्रेस गो हत्या खुलेपणाने करू इच्छित आहे, हे मोठे पाप काँगेस करत आहे. काँग्रेस आता खोटं बोलता येईल तितके बोलत आहे, कारण या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहासजमा होणार आहे. काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याचे धाडस करत नाही. जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेस विभाजन करण्याचा डाव आखत आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची घोषणा करून काँग्रेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहे. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आल्यास जाती जातीत विभाजन करण्याचे काम करेल.
त्यांनी सांगितले की, सर्वांत यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. भारतात कुठे बॉम्बस्फोट झाला, तर पाकिस्तान पहिल्यांदा स्पष्टीकरण देते की आम्ही हे केले नाही. देशातला शेतकरी आत्महत्या करत नाही, जवानांसाठी अनेक योजना सरकार राबवत आहे. देशावर कुठले संकट आले तर राहुल गांधी सर्वात पहिले देश सोडून जातात. कोरोना काळात राहुल गांधी इटलीला निघून गेले होते. राहुल गांधी परदेशात भारताचा अपमान करतात, सबका साथ सबका विकास पंतप्रधान मोदींचा मंत्र होता. त्यामुळे दहा वर्षात अनेक गोष्टी बदलून गेल्या. मोदींच्या नेतृत्वाखाली गडकरींनी अनेक हायवे बांधले. आज देशात दुप्पट हायवे झालेआहेत. आधी पाच शहरांमध्ये मेट्रो धावत होती, आज 20 शहरांमध्ये मेट्रो धावत असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार