50 हजारांहून अधिक रोकड बाळगणाऱ्यांनी त्याबाबतची कागदपत्रे सोबत ठेवावीत - अनमोल सागर
लातूर, 4 मे (हिं.स.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार कालावधी संपत आला असल्याने स्थिर निगराणी प
50 हजारांहून अधिक रोकड बाळगणाऱ्यांनी त्याबाबतची कागदपत्रे सोबत ठेवावीत - अनमोल सागर


लातूर, 4 मे (हिं.स.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार कालावधी संपत आला असल्याने स्थिर निगराणी पथके आणि भरारी पथकांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 50 हजार रुपयेपेक्षा अधिक रोकड सोबत बाळगणाऱ्या नागरिकांनी त्याबाबतचे पुरावे सोबत ठेवावेत, असे आवाहन आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी केले आहे.

मतदानाला काही तास बाकी असून मतदारांना प्रलोभन दाखविणे, त्यांना धमकावणे यासारखे प्रकार टाळण्यासाठी स्थिर निगराणी पथके, भरारी पथके सतर्क करण्यात आली आहेत. अशा प्रकारची कोणतीही घटना आढळून आल्यास नागरिकांनी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयातील तक्रार निवारण कक्षाच्या 02382-224477 या दूरध्वनी क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी. मतदारांना प्रलोभन दाखविणे, त्यांना धमकावणे हा केवळ निवडणूकविषयक गुन्हा नसून भारतीय दंड संहितेनुसार दंडनीय अपराध देखील असल्याचे आदर्श आचारसंहिता कक्षाने कळविले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande