लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज - सांगली जिल्हाधिकारी
सांगली, 6 मे (हिं.स.) : सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी येत्या 7 मे रोजी मतदान
लोकशाहीच्या उत्सवासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज - सांगली जिल्हाधिकारी


सांगली, 6 मे (हिं.स.) : सांगली जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया भयमुक्त आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून याबाबतची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

निवडणूक व मतदान प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे व उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपस्थित होत्या.

जिल्ह्यात 44-सांगली लोकसभा मतदार संघात मिरज, सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठेमहांकाळ आणि जत या सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील 48-हातकणंगले लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा या दोन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

मताचा अधिकार बजावावा

मतदार राजा जागा हो....लोकशाहीचा धागा हो... असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, भारतीय राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने बजावावा. एक मत.... लोकशाहीसाठी या भूमिकेतून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान करुन लोकशाही बळकट करण्यामध्ये आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा

मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारास पाणी, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सावलीची सोय, दिव्यांग मतदारासाठी रॅम्प, व्हील चेअरची व्यवस्था प्रशासनाने केली असून अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली आहे.

जिल्हयात 2 हजार 448 केंद्रावर होणार मतदान

जिल्हयात लोकसभा निवडणूकीसाठी 2 हजार 448 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. त्यामध्ये 281-मिरज विधानसभा मतदार संघात 309 मतदान केंद्रे, 282-सांगली विधानसभा मतदार संघात 308, 283-इस्लामपूर या विधानसभा मतदार संघात 284, 284-शिराळा या विधानसभा मतदार संघात 334, 285-पलुस-कडेगांव विधानसभा मतदार संघात 285, 286-खानापूर विधानसभा मतदारसंघात 348, 287-तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात 299 तर 288-जत विधानसभा मतदार संघात 281 मतदान केंद्रे आहेत. यामध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष मतदान केंद्रे, महिला नियंत्रित केंद्रे, युवा नियंत्रित मतदान केंद्रे, दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे व बुरखाधारी मतदान केंद्रांचा समावेश आहे.

मतदार संख्या

सांगली जिल्ह्यात एकूण 24 लाख 36 हजार 820 मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 12 लाख 43 हजार 397, स्त्री मतदार 11 लाख 93 हजार 291, इतर मतदार 132 यांचा समावेश आहे. 44-सांगली लोकसभा मतदारसंघात 18 लाख 68 हजार 174 मतदार असून यामध्ये पुरूष मतदार 9 लाख 93 हजार 24, स्त्री मतदार 9 लाख 15 हजार 26 तर तृतीयपंथी 124 मतदार आहेत. 48-हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील शिराळा व इस्लामपूर या मतदारसंघाचा समावेश आहे. या दोन विधानसभा मतदारसंघात 5 लाख 68 हजार 646 मतदार असून यामध्ये 2 लाख 90 हजार 373 पुरूष, 2 लाख 78 हजार 265 स्त्री व तृतीयपंथी 8 मतदारांचा समावेश आहे.

मतदान केद्रांवर पुरेसे मनुष्यबळ नियुक्त

जिल्ह्यात मतदान सुरळीत व निर्भयपणे पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर पुरेसे कर्मचारी (10 टक्के राखीवसह) व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये 281-मिरज विधानसभा मतदार संघात 340 टीममध्ये 1360 कर्मचारी, 282-सांगली विधानसभा मतदार संघात 339 टीममध्ये 1355 कर्मचारी, 283-इस्लामपूर या विधानसभा मतदार संघात 312 टीममध्ये 1250 कर्मचारी, 284-शिराळा या विधानसभा मतदार संघात 367 टीममध्ये 1470 कर्मचारी, 285-पलुस-कडेगांव विधानसभा मतदार संघात 314 टीममध्ये 1254 कर्मचारी, 286-खानापूर विधानसभा मतदारसंघात 383 टीममध्ये 1531 कर्मचारी, 287-तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात 329 टीममध्ये 1316 कर्मचारी तर 288-जत विधानसभा मतदार संघात 309 टीममध्ये 1236 कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. असे एकूण 2693 टीममध्ये 10 हजार 771 कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्रावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था

जिल्हयात लोकसभा निवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना नेण्यासाठी व आणण्यासाठी प्रशासनामार्फत वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 50 एस.टी.बसेस, 22 टेम्पो-ट्रॅव्हलर व 122 सुमो-तवेरा-बोलेरो या वाहनांचा समावेश आहे. 281-मिरज विधानसभा मतदार संघात 47 एस.टी.बसेस, 16 सुमो-तवेरा-बोलेरो वाहने, 282-सांगली विधानसभा मतदारसंघात 50 एस.टी.बसेस, 12 सुमो-तवेरा-बोलेरो वाहने, 283-इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघात 37 एस.टी.बसेस, 19 टेम्पो-ट्रॅव्हलर व 8 सुमो-तवेरा-बोलेरो वाहने, 284-शिराळा या विधानसभा मतदारसंघात 51 एस.टी.बसेस, 17 सुमो-तवेरा-बोलेरो वाहने, 285-पलुस-कडेगांव विधानसभा मतदारसंघात 39 एस.टी.बसेस, 14 सुमो-तवेरा-बोलेरो वाहने, 286-खानापूर विधानसभा मतदारसंघात 49 एस.टी. बसेस, 5 सुमो-तवेरा-बोलेरो वाहने, 287-तासगांव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात 37 एस.टी.बसेस, 3 टेम्पो-ट्रॅव्हलर व 37 सुमो-तवेरा-बोलेरो वाहने तर 288-जत विधानसभा मतदारसंघात 40 एस.टी.बसेस, 13 सुमो-तवेरा-बोलेरो वाहनांचा समावेश आहे.

निवडणुकीसंदर्भात cVIGIL ॲपवर 37 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी 26 तक्रारींमध्ये तथ्या न आढळल्याने त्या कमी केल्या तर 11 तक्रारी निकाली काढल्या. आचारसंहितेसंदर्भात 35 तक्रारी प्राप्त झाल्या. यामधील 32 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. 2 तक्रारींमध्ये FIR दाखल करण्यात आले असून एका तक्रारीबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या आत लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी नाही. तसेच प्रचार करण्यास अनुमती नाही. ओपिनियन पोल व एक्झिट पोलवर बंदी. मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत कोणतेही वाहन नेण्यास परवानगी नाही. मतदान संपण्यापुर्वीच्या 48 तास अगोदर कोणताही प्रचार करणेस अनुमती नाही. मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत कोणतेही मतदार मदत केंद्र(बुथ) उभारण्यास अनुमती नाही. प्रिंट मीडीयामध्ये उमेदवारांची जाहिरात देण्यासाठी त्यास MCMC समितीकडून प्रसिध्दी पुर्व प्रमाणिकरण घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीर प्रचार संपल्यानंतर भारत निवडणूक आयोगाकडील सूचनांनुसार लोकसभा मतदारसंघाबाहेरील मतदार संघातून आलेले राजकीय कार्यकर्ते, पक्ष कार्यकर्ते, सभेचे कार्यकर्ते, प्रचार कार्यकर्ते की, जे या मतदार संघातील मतदार नाहीत अशा व्यक्तींनी मतदारसंघाबाहेर स्वह:ताहून निघून जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

अफवांवर विश्वास ठेवू नका

लोकसभा निवडणूक संदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासन देण्यात येत असलेल्या वस्तुनिष्ठ माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. लोकसभा निवडणूकसाठी होणाऱ्या मतदानावेळी कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनामार्फत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande