मुंबई, १२ ऑक्टोबर (हिं.स.) : निवडणुका स्वबळावर लढायच्या की महायुतीत लढायच्या, हा निर्णय जिल्हा पातळीवर ठेवण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांवर निवडणूक लढण्याचा निर्णय सोपवण्यात आला आहे. पण असं करताना आपण महायुतीत आहोत, याचे भान ठेऊन लढावे. आपण जर वेगवेगळं लढलो तरी महायुतीतील मित्र पक्षांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी मुंबईत पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांसह प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
आपण महायुतीत आहोत याचं भान ठेवा आणि टीका करा. नव्या लोकांचा प्रवेश करून घ्या, प्रवेश करून घेताना जुन्या लोकांनी त्यांना स्वीकारावे आणि संघटना वाढवावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
एक वेळ शिंदे चालतील, पण अजितदादांसोबत जाणं नको, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. मात्र काहीही झालं तरी महायुतीत लढायचं हा संदेश भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे मुख्य नेते देत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी