रायगड, 14 ऑक्टोबर (हिं.स.)मौजे सावळे गावात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना सन २०२२ मध्ये पूर्ण झाली असली तरी अद्याप ती सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, भर पावसाळ्यात देखील गावात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गावातील रोहिदास धुळे, सखाराम धुळे, भास्कर दळवी यांनी पुढाकार घेऊन महिलांच्या सह्या असलेला अर्ज पोलीस मित्र संघटनेकडे सादर केला असून, संघटनेच्या माध्यमातून शासन व संबंधित विभागांचे लक्ष वेधण्यात येत आहे.
या मागणीसाठी सावला ग्रामस्थ व पोलीस मित्र संघटना यांच्या वतीने दि. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी एकदिवसीय साखळी उपोषण मौजे सावळे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या उपोषणाद्वारे शासनाचे तसेच राजीप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग रायगड व कर्जत, उपविभागीय अधिकारी कर्जत, तहसिलदार कार्यालय यांचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले जाणार आहे.ग्रामस्थांचा इशारा आहे की, जर साखळी उपोषणानंतरही पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली नाही, तर दिवाळीनंतर बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल. ही चळवळ पक्षनिरपेक्ष असून गावातील सर्व महिला, नागरिक आणि सामाजिक संघटनांचा सहभाग अपेक्षित आहे.या आंदोलनाला पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. रमेश शांताराम कदम यांनी पाठिंबा दर्शविला असून, त्यांनी सर्व कर्जतकर नागरिक, सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांना सावला गावातील महिला आणि ग्रामस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
-------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके