रत्नागिरी, 6 ऑक्टोबर, (हिं. स.) : “सूत्रसंचालन, निवेदन, मुलाखतकार, उद्घोषक या क्षेत्रात निश्चितच व्यवसाय म्हणून शंभर टक्के यशस्वी होता येत. मात्र, हे क्षेत्र आपल्या आयुष्याचा पूर्णवेळ व्यवसाय बनवायचा असेल, तर त्यामागे सातत्य, अभ्यास आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान आवश्यक आहे. स्पर्धा नक्की आहे, पण आपण तयारी केली, तंत्र आत्मसात केले, तर या क्षेत्रातही सहज यश मिळवता येते”, असा विश्वास ज्येष्ठ अभिनेते, प्रसिद्ध सूत्रसंचालक व निवेदक विघ्नेश जोशी यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या चिपळूण शाखेतर्फे बांदल हायस्कूलच्या सभागृहात ‘सूत्रसंचालन व निवेदन कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेत जिल्ह्यातून ४० हून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.
यावेळी कवी प्रमोद जोशी, नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, सचिव डॉ. मीनल ओक, उपाध्यक्ष योगेश बांडागळे, संचालिका मनीषा दामले, नगर परिषद प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात प्रशांत पटवर्धन यांनी अनुभवी आणि ज्ञानी मार्गदर्शक लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कोणत्याही कार्यक्रमाच्या यशात सूत्रसंचालकाचा वाटा महत्त्वाचा असतो, त्यामुळे ही कार्यशाळा सर्वांसाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कवी प्रमोद जोशी यांनी आपल्या समर्पक कवितेद्वारे विघ्नेश जोशी यांच्या सूत्रसंचालक, निवेदक आणि अभिनेता म्हणूनच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. मान्यवरांचा परिचय संगीता जोशी यांनी करून दिला.
विघ्नेश जोशी यांनी सूत्रसंचालन, निवेदन आणि मुलाखतकार म्हणून कार्य करताना येणाऱ्या विविध परिस्थितींविषयी अनुभव सांगितले. सूत्रसंचालक हा केवळ वक्ता नसून, तो संवादाचा पूल असतो. त्याच्यात निरीक्षणशक्ती, शब्दांची जाण आणि मंचावरची समज असावी, असे त्यांनी सांगितले. १०० हून अधिक मुलाखती आणि ४०० पेक्षा अधिक कार्यक्रमांत सूत्रसंचालन केल्याच्या अनुभवातून त्यांनी सहभागींचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मंगेश बापट यांनी मानले. कार्यशाळेच्या यशासाठी श्रीकांत फाटक, ॲड. विभावरी रजपूत, मंदार ओक, मंगेश बापट, संजय सरदेसाई, छाया पोटे, अपर्णा नातू आणि नाट्य परिषदेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी