सोलापूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांतील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही ठिकाणी मोरी व पूलांचे पोचमार्ग पूर्णतः वाहून गेले आहेत. परिणामी,गावातील नागरिक,शालेय विद्यार्थी,महिला व रुग्ण यांना अत्यंत हाल सहन करावे लागत आहेत. पावसाचा जोर ओसरताच सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ ॲक्शनमोडमध्ये येत दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत.
दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. एस.पी. कुंभार व कार्यकारी अभियंता श्री. एम.आर. ठाकरे यांनी क्षतिग्रस्त रस्ते व पुलांची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने तात्पुरत्या दुरुस्तीच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या.
अक्कलकोट उपविभागातील उपविभागीय अभियंता,कनिष्ठ अभियंता,सहाय्यक अभियंता श्रेणी-२ व संपूर्ण तांत्रिक टीमने तात्काळ मुरूम भरून तात्पुरत्या दुरुस्तीची कामे हाती घेतली. दि. ३० सप्टेंबर रोजी बोरगाव ते घोळसगाव दरम्यान मोरी पूलाच्या पोचमार्गाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वाहतूक पुन्हा सुरू झाली असून स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तसेच किरनळ्ळी ते घोळसगाव,सापळे ते बादोले,बोरगाव ते वागदरी या मार्गांवर दि. ३० सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोऱ्यांच्या पोचमार्गांचे तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मुरूम भरून रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले असून शेतकरी,रहिवासी,रुग्ण व शालेय विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचे कार्य यशस्वीपणे पार पडले आहे.
सर्वच बाधित रस्त्यांवर टप्प्याटप्याने तात्पुरत्या दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विभाग सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड