
मुंबई, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। भारत जगातील सर्वात जास्त तरुण लोकसंख्येचा देश आहे. त्यामुळे भारताकडे तरुण मनुष्यबळ आहे. महाराष्ट्र शासनासोबत कतारने करार केल्यास येथील विद्यार्थ्यांना कतारमधील उद्योगांच्या गरजेनुसार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच कतारने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी आणि राज्याच्या विकासात योगदान द्यावे. यामुळे दोन्ही देशांना लाभ होईल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कतार लीडरशिप सेंटरच्या शिष्टमंडळासमवेत कौशल्य मंत्री श्री. लोढा यांनी संवाद साधला. यावेळी मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सचिव डॉ. राजेश गवांदे, कतार लीडरशिप सेंटरचे संबंध व्यवस्थापक महन्ना जबोर अल-नैमी, शिष्टमंडळ प्रमुख रशीद मोहम्मद अल-मेनाई यांच्यासह शिष्टमंडळ सदस्य उपस्थित होते.
कौशल्य मंत्री श्री.लोढा म्हणाले की, १९७३ पासून कतारचे आणि भारताचे राजनैतिक संबंध आहेत. कतारमध्ये 8.5 लक्ष भारतीय नागरिक वास्तव्यास आहेत. ते कतारच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवित आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही दोन वेळा कतार देशाचा दौरा केला आहे. त्यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान तेथील भारतीय समाजाशी संवाद साधत दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे.
कौशल्य मंत्री श्री. लोढा यांनी शिष्टमंडळाचे आभार मानले. दोन्ही देशांमधील मैत्री व विकासाचा मजबूत पाया असल्यास भविष्यात सुंदर आणि सबळ नातेसंबंध उभे राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने श्री. अल-नैमी आणि श्री.अल-मेनाई यांनी संवाद साधला. मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परदेशी यांनी महाराष्ट्रातील विकासकामे व विविध क्षेत्रातील महत्त्व विषद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर