
पुणे, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या कणा असलेल्या पीएमपी, एसटी, रेल्वे मेट्रो स्थानकांबाहेर कायम प्रवाशांची गर्दी असते. दरराेज लाखो प्रवासी यातून प्रवास करतात. परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक याची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, राजधानी दिल्लीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बाॅम्बस्फोटामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त राज्य आणि राज्याबाहेरील लाखो नागरिक राहतात. यामुळे पीएमपी, एसटी, मेट्रो, रेल्वेतून लाखो नागरिक प्रवास करतात. यामुळे बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक परिसरात, मेट्रो स्थानकाबाहेर, शिवाय डेक्कन, कात्रज, हडपसर, शिवाजीनगर या ठिकाणी असणाऱ्या पीएमपी स्थानकांत सीसीटीव्ही यंत्रणांची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे काही अघटित दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु