
रत्नागिरी, 19 नोव्हेंबर, (हिं. स.) : देवरूख येथील सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने आयोजित केलेल्या कथालेखन स्पर्धेत मुंबईतील प्रा. रेखा नाबर यांची कथा सर्वप्रथम आली.
श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालयाने स्व. शालिनी आणि स्व. सदानंद बेंदरकर स्मृती पाचव्या खुल्या कथालेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. स्पर्धेत नंदकुमार इंदिरा पंडित वडेर (सांगली) यांना द्वितीय, तर अमित अशोक पंडित ( कनकाडी, देवरूख) आणि प्रतीक्षा हरिपूरकर (चिंचवड, पुणे) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला आहे.
उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी राजलक्ष्मी संजय सुर्वे रत्नागिरी), प्राची प्रदीप राव (देवरूख,) विनीता वैभव रोठे (बंगळुरू), मोहन कुलकर्णी (अंबरनाथ), प्रशांत पुंडलिक शिरुडे- (डोंबिवली), डॉ. राजेंद्र सावळाराम बावळे (राजापूर) आणि रवीना किशोर घाणेकर (आडिवरे) यांच्या कथांची निवड करण्यात आली आहे.
कथालेखन स्पर्धा खुली असल्याने राज्यातील आणि परराज्यातील विविध ठिकाणाहून एकूण ४० स्पर्धकांनी कथा स्पर्धेसाठी पाठविल्या होत्या. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक इत्यादी विविध राज्यांतून स्पर्धेसाठी कथा आल्या होत्या.
स्पर्धेतील कथांचे परीक्षण बसणी हायस्कूलच्या संस्कृत आणि मराठी विषयाच्या निवृत्त शिक्षिका पद्मजा बापट यांनी केले. वाचनालयाचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांनी सर्व विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन करून, सर्व स्पर्धकांना धन्यवाद दिले आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण येत्या रविवारी, दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता वाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सर्व विजेत्या स्पर्धकांनी पारितोषिकांचा स्वीकार करण्यासाठी आणि अन्य सर्व सहभागी स्पर्धकांनी सहभाग प्रमाणपत्राचा स्वीकार करण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे, अशी विनंती वाचनालयचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी