

नवी दिल्ली, 14 डिसेंबर (हिं.स.)। निसर्गाशी सुसंवाद साधण्याची आपली सांस्कृतिक परंपरा हीच ‘पर्यावरणासाठी जीवनशैली’ या संकल्पनेचा जागतिक पाया आहे. असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होत्या. यावेळी नवी दिल्लीत आयोजित समारंभात त्यांनी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार २०२५ आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानित केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, ऊर्जा बचत म्हणजे केवळ वापर कमी करणे नव्हे, तर ऊर्जा बुद्धिमत्तेने, जबाबदारीने आणि कार्यक्षमतेने वापरणे होय. सौर ऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जेचे पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. यामुळे ऊर्जा बचत होतेच, शिवाय कार्बन उत्सर्जनही कमी होते.
ऊर्जा बचतीबाबत युवक आणि बालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ऊर्जा संरक्षणाची उद्दिष्टे साध्य होतील आणि देशाचा शाश्वत विकासही सुनिश्चित होईल, असे त्या म्हणाल्या.
‘सूर्य घर योजना’ आणि ‘हरित हायड्रोजन मिशन’ यांसारख्या सरकारी उपक्रमांमुळे जीवाश्म इंधनांवरील आपले अवलंबित्व कमी होत असल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. सन २०२३–२४ मध्ये सरकारने ५.३६ कोटी टन तेलाच्या समतुल्य ऊर्जा बचत केली असून, त्यामुळे देशाचा पैसा वाचला आणि प्रदूषणातही घट झाली आहे.
ऊर्जा परिवर्तन यशस्वी करण्यासाठी नागरिकांच्या वर्तनात बदल घडवणे अत्यंत आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.
जनभागीदारी आणि सामूहिक जबाबदारीच्या बळावर भारत ऊर्जा संरक्षणाच्या क्षेत्रात अग्रणी ठरेल आणि हरित भविष्यासाठीची उद्दिष्टे निश्चितच साध्य करेल, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule