
पुणे, 8 डिसेंबर (हिं.स.)। कांदा निर्यातीत घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या दर कोसळल्यामुळे मार्केट यार्ड गुलटेकडी कांदा विभागात दररोज ७० ते ८० ट्रक आवक होत आहे. किलोला केवळ ८ ते १४ रुपये भाव मिळत आहे. उत्पादनाच्या २५ टक्के जादा कांद्याची बाजारात साठवणूक झाल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कांद्याचा लागवडीचा हंगाम हा १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी असतो. मात्र, यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपांचा तुटवडा जाणवत आहे. कांदा बियाणांचे दर प्रतिकिलो २५०० ते ३००० रुपये आहेत. एकरी तीन किलो बियाणे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने आता कांदा लागवड करणे शेतकऱ्यांना परवडत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु