
सोलापूर, 8 डिसेंबर (हिं.स.)। जगभरात झालेली संचार क्रांती सनातन धर्माला जागृत करण्यासाठीच आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय वक्ते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने भारत का भविष्य या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला छत्रपती संभाजी नगरचे देवगीरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे हे प्रमुख पाहुणे होते.
अनंतकाळापासून सनातन धर्म हा प्रत्येकाला जोडण्याचे काम करत आहे. आचार्य चाणक्य आणि वेदव्यास हेच या राष्ट्राचे राष्ट्रपिता आहेत. त्यांच्या विचारावरच भारताचे भविष्य आहे असेही पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी सांगितले.जे सत्य आहे ते बोलले पाहिजे आजच्या पिढीने खरं आहे ते मांडले पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. विविध विषयाची माहिती घेतली पाहिजे. आजच्या संचार क्रांतीच्या काळात ज्याच्याकडे माहिती आहे तो बलवान आहे. महिलांचा आदर केला पाहिजे त्यांचे रक्षण केले पाहिजे सनातन धर्माचे आचरण केले पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर यांनी प्रास्ताविक केले. नंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला त्यानंतर प्रमुख पाहुणे तसेच पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांना पुणेरी पगडी घालून आणि त्यांचे औक्षण करण्यात आले. नंतर त्यांचा सत्कार किशोर शितोळे यांच्या हस्ते करण्यात आला. शितोळे यांचा सत्कार कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे किशोर शितोळे यांनी बोलताना भविष्य पाहायचे असेल तर इतिहास समजून घेतले पाहिजे देशाला सक्षम पंतप्रधान मिळालेले आहेत म्हणून काश्मीर शांत आहे देशाची प्रगती होत आहे असे सांगितले.
शिल्पा जिरांकलगी यांनी पद्य आणि वंदेमातरमचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी तर आभार अमोल धाबळे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला अविनाश महागांवकर, शहाजी पवार, प्रकाश मोकाशे, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, सात्विक बडवे आदींसह अनेक मान्यवरांची गर्दी होती. हुतात्मा स्मृती मंदिरात श्रोत्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड