कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाच्‍या तुळया यशस्‍वीपणे सरकविल्याबद्दल अभियंत्‍यांचा सत्कार
मुंबई, 5 फेब्रुवारी (हिं.स.)।मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील दोन तुळया (गर्डर) रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेच्या
Mumbai


मुंबई, 5 फेब्रुवारी (हिं.स.)।मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणा-या कर्नाक रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पातील दोन तुळया (गर्डर) रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल महानगरपालिकेच्या पूल विभागातील अभियंत्‍यांचा महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्‍या हस्‍ते प्रशस्‍तिपत्र प्रदान करुन सत्‍कार करण्‍यात आला. मुंबई महानगराच्या विकासात अभियंत्‍यांची कामगिरी अभिमानास्‍पद असल्‍याचे श्री. गगराणी यांनी यावेळी नमूद केले.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्‍तांचे कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे, प्रमुख अभियंता (पूल) श्री. उत्तम श्रोते यावेळी उपस्थित होते.

कर्नाक रेल्वे उड्डाणपूल उभारणी कामात महानगरपालिकेच्या वतीने रेल्वे प्रशासनासोबत समन्‍वय साधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, कार्यकारी अभियंता (पूल) (निवृत्‍त) श्री. सखाराम जाधव, सहायक अभियंता श्री. कुणाल वैद्य, दुय्यम अभियंता श्री. अभिषेक देवळेकर यांचा सत्‍कारार्थींमध्‍ये समावेश आहे.

दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मशीद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्प अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची दक्षिण बाजूची लोखंडी तुळई दिनांक १९ ऑक्‍टोबर २०२४ रोजी आणि उत्‍तर बाजूची लोखंडी तुळई दिनांक २६ ते ३० जानेवारी २०२५ रोजी रेल्‍वे भागात सरकविण्‍याची कार्यवाही यशस्‍वीरित्‍या पूर्ण करण्‍यात आली आहे. महानगरपालिका पूल विभागातील अभियंते आणि मध्य रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून, तांत्रिक अडचणींवर वेळोवेळी मात करत तुळई सरकविण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार यांचे यामध्ये उल्लेखनीय योगदान आहे.

या सत्काराप्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी म्‍हणाले की, मुंबई महानगराच्‍या विकासात अभियंत्यांचे महत्‍त्‍वपूर्ण योगदान आहे. मुंबईकरांचा प्रवास अडथळाविरहित आणि सुखकर करणारे पूल, रस्‍ते विभागातील अभियंता, कर्मचारी - अधिकारी म्‍हणजे महानगरपालिकेचा कणा आहे. मुंबईच्‍या भौगोलिक परिस्थितीत दैनंदिन कामकाज करणे आव्‍हानात्‍मक आहे. अनेक अडचणी आणि आव्‍हानांवर मात करत अभियंते कामकाज यशस्‍वीपणे करत आहेत, असे उद्गार श्री. गगराणी यांनी व्यक्त केले.

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) श्री. अभिजीत बांगर म्‍हणाले की, पूल विभागातील प्रकल्प किंवा योजना राबविताना अभियंत्‍यांचे तांत्रिक तसेच प्रशासकीय कौशल्य पणाला लागते. अशा प्रकल्पांचे किंवा योजनांचे कामकाज करताना अभियंत्‍यांचे वैयक्तिक कौशल्य पणाला लागते व त्यातूनच गुणवत्‍ता बहरुन येते. अशा अभियंत्यांचे योगदान विचारात घेऊन त्यांच्या कामकाजाचे कौतुक व्‍हावे, त्यांना चांगल्या कामासाठी प्रोत्साहन मिळावे, या हेतूने पूल विभागातील अभियंत्‍यांचा वैयक्तिक प्रशस्तिपत्र देऊन सत्‍कार करण्‍यात येत आहे. भविष्‍यात या अभियंत्‍यांकडून महानगरपालिकेस अधिकाधिक उत्‍कृष्ट सेवा मिळेल, अशी अपेक्षा देखील श्री. बांगर यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande