रत्नागिरीतील जनता दरबारात दिव्यांगांच्या प्रश्नांचा ऊहापोह
रत्नागिरी, 5 फेब्रुवारी, (हिं. स.) : दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने रत्नागिरीत दिव्यांग जनता दरबार आयोजित केला होता. त्यावेळी दिव्यांगांच्या प्रश्नांचा ऊहापोह झाला. कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू
दिव्यांग जनता दरबारात बच्चू कडू


रत्नागिरी, 5 फेब्रुवारी, (हिं. स.) : दिव्यांगांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने रत्नागिरीत दिव्यांग जनता दरबार आयोजित केला होता. त्यावेळी दिव्यांगांच्या प्रश्नांचा ऊहापोह झाला.

कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू उपस्थित होते. कार्यक्रमात दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणून घेत त्यांची निवेदने स्वीकारण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध संघटनांमध्ये विभागलेल्या दिव्यांगांनी एकत्र येऊन प्रहारच्या माध्यमातून संघर्ष करण्याचे आवाहन श्री. कडू यांनी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी दिव्यांग समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रहार संघटनेत प्रवेश केला.

कार्यक्रमात अतितीव्र दिव्यांग महिलांनी श्री. कडू यांचे औक्षण करून त्यांना सन्मानित केले. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिव्यांग बांधवांसाठी झटणाऱ्या त्यांच्या अथक प्रयत्नांची प्रशंसा करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव आणि कोकण विभाग अध्यक्ष सुरेश कोकण यांच्या उपस्थितीत आनंदकुमार लल्लन त्रिपाठी यांची प्रहार रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून, तर शैलेश पोस्टुरे यांची रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली.

श्री. कडू यांनी आतापर्यंत २०० हून अधिक शासन निर्णय पारित करून घेतल्याचे सांगत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी संघर्ष करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. ग्रामपंचायतीपासून नगरपालिकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी निश्चित केला जावा, अशी ठाम मागणी केली.

कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधवांनी आपले प्रश्न मांडले व संघटित होऊन न्याय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमात संघटनेच्या भावी योजनांवर चर्चा झाली व आगामी काळात दिव्यांगांच्या हक्कांसाठी अधिक तीव्र लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. हा दिव्यांग जनता दरबार दिव्यांगांच्या हक्कांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरला असून, रत्नागिरीतील दिव्यांग बांधवांना संघटित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande