लाहोर , 25 एप्रिल (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारताशी व्यापार, शिमला करारासह अनेक द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारताच्या विमानांना पाकिस्तानी हवाई हद्द बंद केली आहे.सिंधू करारानुसार मिळणारे पाणी अन्यत्र वळविण्याचा भारताचा कोणताही प्रयत्न युद्धसदृश कृती मानला जाईल, असा कांगावा पाकिस्तानने केला.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी(दि.२४) झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर अनेक निर्णय जाहीर करण्यात आले.यामध्ये वाघा सीमा तत्काळ बंद करण्याचा व या मार्गाने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानने भारताशी असलेले सर्व करार स्थगित केले आहेत. जे भारतीय वैध मार्गाने पाकिस्तानात आले आहेत, त्यांनी ३० एप्रिलपूर्वी परत जावे असा आदेश देण्यात आल्याचे पाकिस्तानने एका निवेदनात म्हटले आहे.
यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील शहरांमधून होणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना आता नियोजित ठिकाणी पोहोचण्यास अधिक वेळ लागणार आहे.याचा परिणाम म्हणून तिकिटांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. उत्तर अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये जाताना आता विमानांना दुसऱ्या मार्गाने अधिक अंतर प्रवास करून जावे लागणार आहे. त्यामुळे मध्य पूर्वेकडील देशांचा प्रवास महागणार आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो या कंपन्यांनी सांगितले की, त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला आहे. एअर इंडियाने स्पष्ट केले की उड्डाणे आता पर्यायी मार्गाने जाणार आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस आणि स्पाईसजेट कंपन्याना अरबी समुद्रावरून जाणारा तसेच अधिक दूर असलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल. त्यामुळे खर्चही वाढणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode