“भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट
आपली संस्कृती, आपला अभिमान यांचा ऐतिहासिक आणि लोभस अनुभव…. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधुन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज य
“भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट


आपली संस्कृती, आपला अभिमान यांचा ऐतिहासिक आणि लोभस अनुभव….

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधुन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' ची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत 9 जूनपासून सुरू होत आहे.

या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत. या सहली दरम्यान महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना याची देही, याची डोळा अनुभव घेता येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि शासन यांच्यावतीने भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा मानस आहे. ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे.

भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) यांच्याशी समन्वय साधून, या ऐतिहासिक उपक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून विविध अंगांनी सुसज्ज तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे या गौरवशाली यात्रेचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल.

भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे.

यात्रेच्या दरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी IRCTC च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या दिव्य प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल.

प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, ज्ञानवृद्ध गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने याला भावनिक व आध्यात्मिक स्पर्श दिला जाईल.

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजोमय इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.

संपूर्ण उपक्रमास पर्यटन विभागाचे प्रधान सचिव मा. डॉ. अतुल पाटणे (भा.प्र.से.) सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाच्या या सहलीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला एक वेगळा आयाम मिळणार आहे. या उत्साही यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा उचलावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे”, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मा. मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी केले आहे.

या उपक्रमासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वाल, वरीष्ठ व्यवस्थापक श्री. संजय ढेकणे तसेच सर्व संबंधित अधिकारी समन्वय आणि परीश्रम करीत असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहे, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी सांगितले आहे.

ही यात्रा म्हणजे एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि भावनिक सहल आहे — जिच्या प्रत्येक क्षणात 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष घुमणार आहे….!!!

- दीपक हरणे,

प्रादेशिक व्यवस्थापक,

* पर्यटन विकास महामंडळ.*

भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) प्रस्तुत – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट विशेष पर्यटक ट्रेन – Bharat Gourav Tourist Train.

🔶 सहल तपशील -

 सहलीचे नाव: छत्रपती शिवाजी महाराज सर्किट

 शुभारंभ दिनांक: 09 जून 2025

 कालावधी: 5 दिवस / 6 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)

 प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई

 इतर चढाई/उतराई स्थानकं : दादर, ठाणे

🚆 यात्रेचा प्रवासमार्ग

मुंबई (CSMT) – रायगड – पुणे – शिवनेरी – भीमाशंकर – प्रतापगड – कोल्हापूर – पन्हाळा – मुंबई.

🏰 प्रमुख स्थळांची माहिती

 रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.

 लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.

 कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.

 शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.

 भीमाशंकर ज्योतिर्लिंग – 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.

 प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.

 कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर

 पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

💰 पॅकेज शुल्क (प्रति व्यक्ती): -

उपरोक्त सहलासाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3AC), सुपीरियर (2AC) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती IRCTC च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ती अशी -

Economy (SL) - Rs. 13,155/-

Comfort (3AC) - Rs. 19,840/-

Superior (2AC) - Rs. 27,365/-

✅ पॅकेज मध्ये समाविष्ट सेवा: -

 भारत गौरव ट्रेनने प्रवास (SL / 3AC / 2AC)

 AC / Non-AC हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था

 सर्व ठिकाणी स्थानिक वाहतूक व गाईड

 ऑनबोर्ड व ऑफबोर्ड शुद्ध शाकाहारी भोजन

 प्रवास विमा, सर्व प्रवेश शुल्क (किल्ले, मंदिरे, रोपवे, शिवसृष्टी इत्यादी)

 सुरक्षा व्यवस्था.

❌ पॅकेजमध्ये नसलेल्या सेवा: -

 साहसी खेळ, बोटिंग इत्यादी.

 खोलीतील सेवांसाठी वेगळी रक्कम आकारली जाईल.

 इतर कोणताही वैयक्तिक खर्च.

 कोणतेही अतिरिक्त पर्यटन स्थळ.

🗓️ दैनंदिन टूर कार्यक्रम (संक्षिप्त): -

 पहिला दिवस: मुंबई – रायगड – पुणे.

 दुसरा दिवस: पुणे (लाल महाल, शिवसृष्टी, कसबा गणपती).

 तिसरा दिवस: शिवनेरी – भीमाशंकर – पुणे.

 चौथा दिवस: प्रतापगड – कोल्हापूर.

 पाचवा दिवस: कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ला – मुंबई.

 सहावा दिवस: मुंबई (टूर समाप्त).

📌 आरक्षण व अधिक माहिती साठी संपर्क: -

IRCTC वेबसाईट: www.irctctourism.com

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande