जळगाव, 20 मे (हिं.स.) यावल तालुक्यातील महेलखेडी येथील माहेर असलेली विवाहिता पतीसोबत दुचाकीहून महेलखेडी जात असताना विरावली गावाजवळ विवाहितेने दुचाकी थांबवत शेतातील विहिरीत धावत जाऊन उडी घेतली. हा प्रकार निदर्शनास येताच पतीने आरडाओरड केल्यानंतर नागरिकांनी धाव घेत विवाहितेला विहिरीतून काढून यावल रुग्णालयात आणले. येथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विवाहितेच्या माहेरील लोकांनी मात्र तिच्या पतीनेच तिला विहिरीत ढकलल्याचा आरोप केला आहे. मुस्कान अल्ताफ तडवी (वय 20) असे मयत विवाहितेचे नाव आहे.
मुस्कान या विवाहितेला दुचाकीवर घेऊन तिचे पती अल्ताफ रहेमान तडवी (महेलखेडी) हे गावी जात होते. विरावली गावाजवळ शेत गट क्रमांक 57 येथे विवाहितेने पतीला दुचाकी थांबवण्याचे सांगितले आणि ती दुचाकी उतरून थेट शेतातील विहिरीत जाऊन तिने विहिरीत उडी घेतली. हा प्रकार तिच्या पतीने पाहून आरडाओरड केली. नागरिकांनी तेथे धाव घेऊन विवाहितेला विहिरीतून बाहेर काढले व यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. यावल ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून विवाहितेला मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पतीने विहिरीत ढकलल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरील लोकांनी केला आहे. याप्रकरणी पुढील तपास डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर