मुंबई, 12 जून (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील टायर पायरोलिसि रिसायकलींग कंपन्यामधील तसेच इतर उद्योगांमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून सर्वेक्षण करावे आणि या संबंधीचा अहवाल एक महिन्यात द्यावा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.
पालघर जिल्ह्यातील रेड झोन परिसर वाडा तालुक्यातील टायर पायरोलिसिस रिसायकलींग कंपन्यामधील प्रदूषणाबाबत तसेच बोईसर औद्योगिक क्षेत्र व सातपाटी- मुरबे खाडी मधील रासायनिक प्रदूषण बाबत वन मंत्री श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. त्यावेळी श्री. नाईक बोलत होते. यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, प्रधान वन संरक्षक नरेश झिरमुरे, उपसचिव विवेक होशिंग, उदय ढगे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
वन मंत्री श्री नाईक म्हणाले की, आम्ही कोणत्याही उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र उद्योगांमुळे प्रदूषण होत असेल आणि ते कमी करण्यासाठी संबंधित कंपन्या उपाय योजना करत नसतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी. पालघर जिल्ह्यातील वाडा, तारापूर व बोईसर या तालुक्यातील मोठ्या प्रमाणात टायर रिसायकलिंग कंपन्या तसेच इतर औद्योगिक कारखाने आहेत. या कंपनीमध्ये सुरक्षा विषयक नियमांचे पालन होते का, वापरलेले पाण्याचे विल्हेवाट योग्य पद्धतीने होते का. प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडले जाते का या सर्वांची माहिती समितीने घ्यावी. तसेच या उद्योगांमुळे पाणी, हवा आणि ध्वनी प्रदूषण होते का याचाही अभ्यास करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आम्ही उद्योगाच्या विरोधात नसून दुसऱ्याच्या जीवनाला बाधक उद्योग बंद व्हावेत ही भूमिका आहे. पालघर जिल्ह्यात सुंदर पालघर, दुर्गंधीमुक्त पालघर, प्लास्टिक मुक्त पालघर हे अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याचेही मंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.
यावेळी वाडा व बोईसर तालुक्यातील ग्रामस्थ आणि उद्योजक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर