अमरावती, 3 जून (हिं.स.) : अमरावतीजिल्ह्यातील पशूधनाची अचूक माहिती व्हावी, यासाठी येत्या तीन महिन्यात प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. तसेच प्राण्यांचे टॅगींग करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. आज जिल्हाधिकाीर कार्यालयात प्राणीक्लेश समितीची सभा पार पडली. यावेळी जिल्हा अधिक्षक पोलिस अधिकारी विशाल आनंद, पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह समितीचे सदस्य आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यातील पशू गणनेची माहिती घेतली. पशूधन वाढविण्यासाठी सर्वकष प्रयत्न करण्यात यावे. तसेच येत्या पावसाळ्याच्या कालावधीत जनावरांना आजाराची लागण होऊ नये, यासाठी लसीकरण तसेच खबरदारी घेण्यात यावी. येत्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची तस्करी होऊ नये, यासाठी जिल्ह्यात आठ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहे. गोवंशाची वाहतूक होऊ नये, यासाठी परिवहन विभागानेही दक्ष राहावे. तसेच गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्यास त्याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलिस विभागातर्फे योग्य कार्यवाही करण्यात येईल. बकरी ईदला गोवंशाचा बळी टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. बकरी ईदला प्राण्यांचा बळी देण्यात येतात. मात्र यावर्षी बकरी ईदला गोवंशाचा बळी देण्याचे टाळावे. गोवंशाचा बळी देणे कायद्याने गुन्हा असून असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल. गोवंशाचा बळी देऊ नये, यासाठी जनजागृती करावी, तसेच कायद्याची माहिती नागरिकांना द्यावी. येत्या काळात जनावरांची खरेदी विक्री होत असलेल्या ठिकाणी लक्ष ठेऊन ही विक्री नियमाप्रमाणेच होण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असेही येरेकर यांनी सांगितले. -------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी