राज्या कडून मृतकांच्या वारसांना 10 लाखांची मदत
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेवर व्यक्त केला शोक
बंगळुरू, 04 जून (हिं.स.) : कर्नाटकच्या बंगळुरुमध्ये आरसीबीच्या विजयी परेड दरम्यान आज, बुधवारी चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत.
जखमींवर जखमींना बोरिंग हॉस्पिटल आणि वैदेही हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहिती
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिली. दरम्यान कर्नाटकची घटना हृदयद्रावक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.
आरसीबीच्या विजयी परेडच्या दरम्यान बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठी गर्दी झाली होती. यानंतर स्टेडियमच्या बाहेरही मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दी कमी व्हावी म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जातं. मात्र, याचवेळी चेंगराचेंगरी झाली आणि किमान 11 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या घटनेत 15 पेक्षा जास्त जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याबरोबर माझे विचार आहेत. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो असे मोदींनी नमूद केले आहे.
यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक येतील याची आम्हाला कल्पना नव्हती. साधारण 3 लाख लोक विधान सौधा भागात जमा झाले होते. मैदानाची क्षमता 35 हजार इतकीच आहे.
चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही 10 लाखांची मदत जाहीर करत आहोत. अशीही घोषणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली. तसेच या घटनेची चौकशी समिती नेमून केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपाने कर्नाटक सरकारवर टीका केली. भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र म्हणाले की, “या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे, तेव्हा कर्नाटक सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता विजय रॅली काढण्याची घाई केली. त्यामुळे ही दुर्घटना घडली”, असा आरोप बीवाय विजयेंद्र यांनी केला आहे“तसेच कर्नाटक सरकारने पूर्वतयारी केली नाही, कारण त्यांना फक्त प्रसिद्धीमध्ये रस होता. याचा परिणाम या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला. तसेच काही लोकांवर उपचार सुरु आहेत. मी आता काही पीडितांशी बोललो आहे, त्यांनी सांगितलं की रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र यांनी केली आहे.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी