काँग्रेसच्या माजी मंत्र्याची संघाच्या मंचावरून मागणी
नागपूर, 05 जून (हिं.स.) : धर्मांतरण ही आदिवासी समाजासमोरील सर्वात मोठी समस्या आहे. आदिवासींना धर्मांतरणाचा सर्वात मोठा धोका आहे व कोणत्याही राज्य शासनाने याला गंभीरतेने घेतले नाही. मात्र आता धर्मांतरणविरोधी कायदा झाला पाहिजे. संघाने या मोहिमेला गती द्यावी, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांनी गुरुवारी नागपुरात केले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
काँग्रेसच्या शासन काळात केंद्रीय राज्यमंत्रीपद भूषवणारे काँग्रेसचे दिग्गज नेते अरविंद नेताम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंचावरून काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. नेताम यांनी यावेळी राजकीय भाषण टाळले. यावेळी ते म्हणाले की, देशात आदिवासी समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. अनेकदा सरकार-प्रशासनासमोर गेल्यावर सुनावणीच होत नाही. त्यामुळेच मी संघाकडेच आशेने पाहतो आहे. धर्मांतरणासोबतच आदिवासींचे विस्थापन हीदेखील मोठी समस्या आहे. विकासाच्या नावावर केंद्र शासनाकडून उद्योगपतींना मदत होत आहे. संघाने सर्वांना समान भागीदारी ळेल यासाठी पुढाकार घ्यावा. आदिवासींच्या जमिनी नेहमीसाठी अधिग्रहित न करता लीजवर घ्याव्या. काम झाल्यावर संबंधित जागा आदिवासींना परत कराव्या. छत्तीसगडमध्ये मागील अनेक वर्षात पैसा कायद्याचे पालन झाले नाही. संघाने हा विषय गंभीरतेने घ्यावा, असे नेताम म्हणाले. डिलिस्टिंग धर्मातरण रोखण्यासाठी मोठे अस्त्र ठरू शकते. त्याच्या समर्थनार्थ वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न हवा, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.
छत्तीसगडमध्ये नक्षलवादाला ठेचण्याचे काम सुरू आहे. मात्र नक्षलवादाची विचारधारा अनेकांमध्ये कायम आहे. भविष्यात नक्षलवादी परत डोके वर काढण्याचा धोका आहे. त्यामुळे त्यादृष्टीने धोरण तयार झाले पाहिजे, अशी मागणी नेताम यांनी यावेळी केली. यासोबतच नेताम यांनी एक मोठी मागणी देखील केली. धर्म कोड मिळावा अशी आदिवासींची मागणी समोर येत आहे. आम्हाला नविन सामाजिक विचारधारा तयार करायची नाही. मात्र आदिवासींनादेखील मान्यता मिळायला हवी. देशात आदिवासी समाजाची ओळख हळूहळू संपत आहे. धर्म कोड असला तर पुढील पिढ्यांना भूतकाळ व ओळख कळेल, असे नेताम म्हणाले. संघभूमीत येऊन बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. संघाच्या शताब्दी वर्षात येथे येणे हा गौरवाचा क्षण आहे. देशाची अखंडता व सामाजिक समरसतेसाठी देशात संघ वगळता कुठल्याही संघटनेने काम केलेले नाही असे नेताम यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी