नागपूर, 07 ऑगस्ट (हिं.स.) : इतकी वर्षे कष्ट उपसल्यानंतर आता चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे आम्हाला देखील काहीतरी मिळावे असा शिवाचा स्वभाव नाही. शिववृत्तीचे अनुसरण करणाऱ्यांमध्ये त्यागाचीच भावना असायला हवी असे सांगत सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांनी सत्तेकडे आशाळभूतपणे पाहणाऱ्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. नागपूरच्या दिनदयाल नगरातील पांडुरंगेश्वार महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजन केल्यानंतर ते बोलत होते.
याप्रसंगी डॉ. भागवत म्हणाले की, मनुष्याच्या स्वभागावीतल लोभ आणि कट्टरतेमुळे जगात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कट्टरतेतून राग-द्वेष निर्माण होतात व त्यातून युद्ध होतात. मलाच पाहिजे ही स्वार्थाची वृत्ती आणि भेदभाव या मनुष्याच्या प्रवृत्तीची काळी बाजू आहेत. ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. हीच प्रवृत्ती बदलणे म्हणजे शिवाचे पूजन असल्याचे त्यांनी सांगितले. परस्परविरोधी बाबींची सांगड घालून नवनीत कसे काढायचे हे परंपरेने आपल्याला ठावूक आहे. त्यामुळे ती परंपरा पुढे नेणाऱ्या पूजा, यात्रा यामागील भाव ओळखून कार्य करत संस्कार आपल्या अंगी बाळगला पाहिजे. जगाला दिलासा देण्याची ताकद आपल्यातच आहे, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.
शिवाची भक्ती सर्व पंथांचे लोक करतात. कावडीयांची मोठी परंपरा आपल्या देशात आहे. इकडचे पाणी दुसरीकडे नेतात. आपल्याला जे चांगले सापडले ते आपल्याकडे न ठेवता इतरांपर्यंत न्यायचे हा त्यामागचा विचार आहे. प्रत्येक कृतीच्या मागे एक भाव असतो व तो समजून काम केले तर ती संस्कृती होते व त्यातूनच संस्कार निर्माण होतात. त्यामुळे परंपरेच्या कृतीमागील भाव समजून घ्यावा असे आवाहन सरसंघचालकांनी केले. जगात परिवर्तन येत असल्याचे विचारवंत म्हणतात. या बदलत्या काळात माणसाने योग्य दिशा धरली नाही तर तो विनाशाचा काळ ठरू शकतो. मात्र काळ ओळखून नीट पावले योग्य दिशेने टाकली तर मनुष्याच्या जीवनाचे नवीन उन्नत स्वरुप उभे राहते. जगात असे स्वरुप भारतीयांच्या नेतृत्वाखालीच उभे राहू शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी