
मुंबई, 18 एप्रिल, (हिं.स.)। लोकप्रिय मल्याळम टीव्ही अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल याचे वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झाले. गेली दोन वर्षे तो या गंभीर आजाराशी धैर्याने झुंज देत होता, मात्र अखेर त्याची झुंज आज अपयशी ठरली. त्याच्या निधनाची माहिती अभिनेत्री सीमा नायर हिने सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे दिली. उपचारांच्या काळात ती सतत त्याच्यासोबत होती. तिच्या पोस्टमध्ये तिने भावनिक शब्दांत दु:ख व्यक्त केले.
ती म्हणाल्या, सगळी आशा संपली. गेली 2 वर्षे मी तुझ्यासाठी लढत राहिले. माझं मन आणि शरीर थकलं असतानाही तुझा जीव वाचवण्यासाठी मी धावत राहिले. तुला आता आणखी त्रास नको, हे आज देवाने ठरवलं. सिद्धार्थ, मी हे सहन करू शकत नाही, मी पूर्णपणे खचले आहे
सिद्धार्थ हा मल्याळम टीव्ही क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा होता. त्रिशूरमधील चालकुडीचा रहिवासी असलेल्या सिद्धार्थला कॉलेजपासून अभिनयाची आवड निर्माण झाली आणि तो व्यावसायिक रंगभूमीवरही कार्यरत होता. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात निवेदक म्हणून केली आणि त्यानंतर, निर्माते अरुण घोष यांच्या मदतीने त्याने टीव्ही मालिकांमध्ये पदार्पण केलं. ‘कस्तुरीमन’ आणि ‘भाग्यजातकम’ सारख्या लोकप्रिय मालिकांमधून सिद्धार्थ ने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. साधेपणा, अभिनयाची आवड आणि जिद्दीमुळे तो घराघरात पोहोचला.
दरम्यान, अभिनेते किशोर सत्या यांनीही श्रद्धांजली अर्पण करत त्याच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली. त्याच्या जाण्याने टीव्ही इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सिद्धार्थआधी काही दिवसांपूर्वीच कन्नड अभिनेता हरिशचा अपघातात मृत्यू झाला. अनेक कन्नड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये व्हिलनच्या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर